शबनम न्यूज : पुणे (दि.१४ एप्रिल) :- महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त चौकाचौकात घुमणारी भीमगीते त्यांना फार आवडायची, त्या गीतामधून सांगितलेले बाळासाहेबांचे कार्य त्यांच्या मनाला भावायचे. अनेक भीमगीते गुणगुणत गुणगुणत त्यांना ती तोंडपाठच झाली. मग ती गाणी त्या मोठ्या हौसेने विविध कार्यक्रमात गाऊ लागल्या आणि गेली २८-३० वर्ष त्या भीमगीते व प्रबोधन गीते सादर करत आहेत. प्रबोधनाचा हा वसा घेतलेल्या त्या कार्यकर्त्या म्हणजे नकुसाबाई लोखंडे (वय ६३).
नकुसाबाई गेली ४० वर्षे पुण्यात स्थायिक आहेत. विवाहानंतर उदरनिर्वाहासाठी त्या पुण्यात आल्या. विविध ठिकाणी मजूरीची कामे त्यांनी केली.
तेव्हा नकुसाबाई निरक्षर होत्या पण त्यावेळी त्या राहात असलेल्या वस्तीत झालेल्या प्रौढ साक्षरता वर्गात शिकून त्या साक्षर झाल्या. इतर महिलांनाही लिहायला-वाचायला शिकवले आणि तिथपासून नकुसाबाईंच्या सामाजिक कार्याची सुरवात झाली.
स्त्री आधार केंद्राच्या एका शिबिरात नकुसाबाईंनी पहिल्यांदाच बाळासाहेबांवरचे गीत गायले. महिलांनी टाळ्या वाजवून त्यांचे कौतुक केले.
तेव्हा नकुसाबाईंना आपल्याकडे गायनाची कला आहे हे उमगले आणि त्यांनी भीमगीते पाठ करायला सुरवात केली. लिहायला-वाचायला अवघड जायचे पण गाणी ऐकून ऐकून पाठ करायच्या. नंतर नंतर मुलाबाळांच्या मदतीने शब्दांची जुळवाजुळव करत त्या स्वतः गाणी रचू लागल्या. विविध पुस्तकांच्या वाचनातून थोरांचे विचार समजून घेताना त्यांचा शब्दसंग्रहही वाढत गेला.नकुसाबाईंनी आजवर थोर व्यक्तींंच्या जीवनावर बरीच गाणी रचली आहेत.
त्यांच्या गाण्यांचे पुस्तकही प्रकाशित झाले आहे. एवढेच नव्हे तर विविध प्रबोधन गीतांना चित्रपट गीतांची चाल लावून ती गाणी सुश्राव्य केली आहेत.
गेली तीस वर्षे शहरात आणि शहराबाहेर होणारया विविध सामाजिक कार्यक्रमात नकुसाबाई प्रबोधन गीते सादर करत आहेत व त्यातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, संत तुकाराम महाराज यांचे विचार व कार्य जनमानसापर्यंत पोचवत आहेत. ७०-८० गीते त्यांना मुखोद्गत आहेत.
या प्रबोधनाच्या कार्यासाठी नकुसाबाईंना अनेक पुरस्कारानी सन्मानित करण्यात आले आहे. नकुसाबाईंचे हे कार्य म्हणजे समाजमन घडवण्याचा सातत्यपूर्ण सुंदर प्रयत्नच आहे.
नकुसाबाई म्हणतात, “सुरवातीला मी गाणी गायला लाजायची. पण नंतर मला प्रबोधन गीते गाण्याची हौस वाटू लागली. प्रबोधन गीते गायनातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि थोरांचे विचार समाजापर्यंत पोचवत राहणार आहे. बहुजन समाजाने संघटीत होऊन थोरांचे विचार आचरणात आणले पाहिजे.”
संध्या टोमके (पत्रकार, पुणे)