शबनम न्यूज : आळंदी (दि.२६ एप्रिल) :- श्री गजानन महाराज शिक्षण प्रसारक मंडळ संचलित, शरदचंद्र पवार कला आणि वाणिज्य महाविद्यालय, डुडूळगाव आळंदी या ठिकाणी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राअंतर्गत युनिक अकॅडमी सोबत सामंजस्य करार, स्पर्धा परीक्षा विभागाचे उदघाटन आणि ‘ पदवी काळात यु.पी.एस.सी. व एम.पी.एस.सी. स्पर्धा परीक्षांची तयारी कशी करावी’ या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन, प्रतिमापूजन व वैष्णवी पांचाळ, काजल पवार आणि विशाखा म्हसदकर यांच्या स्वागत गीताने झाली. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करतांना प्रा. माणिक कसाब स्पर्धा परीक्षा विभाग प्रमुख यांनी एम.पी.एस.सी.,यु.पी.एस.सी. परीक्षेच्या अभ्यासक्रमाचे स्वरूप, अभ्यासाचे नियोजन, अभ्यासक्रमाची पुस्तके व मुलाखतीची तयारी याविषयी सविस्तर विवेचन करून प्रमुख पाहुण्यांचे स्वागत केले .
यावेळी प्रमुख पाहुण्यांचा परिचय प्रा. कैलास अस्तरकर यांनी करून दिला.या कार्यक्रमाचे उदघाटक व प्रमुख व्याख्याते मा. श्री. शरद पाटील युनिक अकॅडमी यांनी स्पर्धा म्हणजे काय? एम.पी.एस.सी, यू,पी.एस.सी या परीक्षांना स्पर्धा परीक्षा का म्हणायचे? तसेच जीवनात योग्य नियोजन केले तर एकाच वेळी दोन्ही परीक्षेमध्ये विद्यार्थी कसा यशस्वी होऊ शकतो याबाबत मार्गदर्शन केले.अभ्यास करताना काटेकोर नियोजनाचे तंत्र आपल्याला जमले पाहिजे यासाठी प्रचंड मेहनतीची आवश्यकता असून कष्टा विना फळ नाही असे मत व्यक्त केले. एम.पी.एस.सी. व यु.पी.एस.सी या संस्थेची निर्मिती प्रशासकीय अधिकारी निर्माण करण्यासाठी झाली असून या संस्थेमार्फत कोणकोणत्या पदांच्या परीक्षा घेतल्या जातात तसेच पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा आणि मुलाखतीची तयारी कशी केली पाहिजे, त्या साठी कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले जातात याबाबत विविध यशस्वी व्यक्तींचा संदर्भ देत बहुमुल्य मार्गदर्शन केले.
अध्यक्षीय समारोप करताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. हंसराज थोरात यांनी एम.पी.एस.सी. व यु.पी.एस.सी.या नागरी सेवा परीक्षांचा अभ्यास करतांना नियोजनाची आवश्यकता असल्याचे सांगितले. आरोग्याची सकारात्मक व नकारात्मक च:तुसूत्री याबाबत विवेचन करीत आरोग्य चांगले असेल तर आपण कुठलीही परीक्षा सहज रित्या उत्तीर्ण होऊ शकतो आणि आपण ठरविलेले इप्सित साध्य करू शकतो असे मत व्यक्त करीत विविध उदाहरणासह मार्गदर्शन केले. स्पर्धा परीक्षेची तयारी करताना विद्धयार्थ्यांनी करिअर चे खाजगी क्षेत्रातील रोजगार संधी आणि उद्योजकता हे हि पर्याय लक्षात घेतले पाहिजेत असे त्यांनी सांगितले.
या कार्यक्रमासाठी श्री गजानन महाराज शिक्षण प्रसारक मंडळाचे खजिनदार मा.श्री. मयूर मुरलीधर ढमाले यांचे अनमोल मार्गदर्शन लाभले.या कार्यक्रमाला प्रा. संजीव कांबळे, प्रा.शैला वाळुंज,प्रा.डॉ. रणजित कदम,प्रा. विकास दिघे, प्रा. यशोदा खुळखुळे, प्रा. सविता मानके, प्रा. प्रेरणा पाटील, प्रा. सोनाली अभंग, प्रा. रेखा सुतार, प्रा. डॉ. सुरेंद्र पवार, प्रा. विश्वनाथ व्यवहारे, प्रा. डॉ. राजू शिरसकर,श्री. प्रवीण भावे इत्यादी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. दिलीप बारी यांनी केले तर उपस्थितांचे आभार प्रा. परमेश्वर भताशे यांनी मानले. या कार्यक्रमाची सांगता सामूहिक पसायदानाने झाली. अशी माहिती महाविद्यालयाचे प्रसिद्धी विभाग प्रमुख, प्रा. प्रविण डोळस यांनी दिली.