शबनम न्युज | पिंपरी चिंचवड
कष्टकरी कामगारांच्या, शेतकऱ्यांच्या कष्टातून सत्तर वर्षात जे उभे केले ते भाजपाने सात वर्षात मातीत घातले. रोज वाढत जाणाऱ्या महागाईचा आवाज दाबण्यासाठी भोंग्याचा आवाज वाढवण्याचा केविलवाणा प्रयत्न भाजप करीत आहे. आता काँग्रेस शांत बसणार नाही सामान्य माणसांचे विषय घेऊन काँग्रेस रस्त्यावर उतरत आहे. क्रुड ऑईल चे दर साठ डॉलरपेक्षा कमी असताना केंद्र सरकारने भाववाढ करून 27 लाख कोटी रुपये सामान्य नागरिकांच्या खिशातून काढून घेतले. महागाईबाबत निर्लज्जपणाचा कळस म्हणजे भाजप आहे. भाजपच्या काळात कर्जाचे प्रमाण सकल उत्पन्नाच्या 90 टक्के पर्यंत झाले आहे अजूनही कर्ज घेणे सातत्याने सुरू आहे. राज्यसरकारने सीएनजी वरील कर साडेतेरा टक्के वरून तीन 3 टक्क्यांवर आणला आणि केंद्र सरकारने पुन्हा त्यात वाढ केली. सामान्य माणसांच्या विरोधातील धोरण केंद्रातील भाजप सरकार राबवित आहे अशी टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेश प्रवक्ते अतुल लोंढे यांनी पिंपरी येथे केली.
बुधवारी (दि. ११ मे) पिंपरी येथे झालेल्या पत्रकार परिषदेत पिंपरी चिंचवड शहर काँग्रेस अध्यक्ष डॉ. कैलास कदम, राष्ट्रीय काँग्रेसचे सचिव पृथ्वीराज साठे, युवक शहराध्यक्ष कौस्तुभ नवले, माजी महापौर कवीचंद भाट, माजी नगरसेवक विश्वास गजरमल, ज्येष्ठ नेत्या निगार बारस्कर, सेवादल शहराध्यक्ष वीरेंद्र गायकवाड, शहर काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष नरेंद्र बनसोडे, महाराष्ट्र प्रदेश एनएसयुआयचे प्रदेश उपाध्यक्ष उमेश खंदारे, ब्लॉक अध्यक्ष विश्वनाथ जगताप, ज्ञानेश्वर उर्फ माऊली मलशेट्टी, दिनकर भालेकर, शिक्षण मंडळाचे माजी अध्यक्ष अभिमन्यू दहितूले आदी उपस्थित होते.
यावेळी अतुल लोंढे म्हणाले की, राष्ट्रद्रोहाचे कलम लोकशाहीत योग्य नाही हे काँग्रेसचे धोरण आहे. देशाची अर्थव्यवस्था धोक्यात आणण्याचे काम केंद्रातील भाजप सरकार करीत आहे. केंद्रातील भाजपाला भ्रष्टाचाराची लागलेली कीड पिंपरी चिंचवड शहरापर्यंत आली आहे. देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते पिंपरी चिंचवड शहरातील पहिली केंद्र सरकारची कंपनी हिंदुस्तान एंटीबायोटिक्सची स्थापना करण्यात आली. भोसरी, पिंपरी, चिंचवड, आकुर्डी आणि निगडी या पाच गावांचे एकत्रीकरण करून दिवंगत खासदार अण्णासाहेब मगर यांच्या कल्पनेतून पिंपरी चिंचवड शहराची स्थापना करण्यात आली. देशाचे माजी उपपंतप्रधान दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्राला औद्योगिक चालना मिळाली. ५१ वर्षांपूर्वी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची स्थापना झाली. शहराचे पहिले महापौर म्हणून काँग्रेस पक्षाने ज्ञानेश्वर लांडगे यांना संधी दिली. या शहराच्या सर्वांगीण विकासामध्ये काँग्रेस पक्षाचे योगदान आहे तसेच या शहराला सजवण्यात, नटवण्यात आणि वाढवण्यात शहरातील कष्टकरी कामगार वर्गांचा सिंहाचा वाटा आहे. ज्या लांडगे साहेबांना शहराचा प्रथम महापौर होण्याचा सन्मान काँग्रेसने दिला त्यांचे चिरंजीव मागील पाच वर्षांपूर्वी भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारीवर निवडून आले. मागील वर्षी स्थायी समितीचे अध्यक्षपद भूषवित असताना त्यांना लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने महापालिकेच्या प्रशासकीय भवनात अटक केली.
ही घटना शहराच्या नावलौकिकास काळीमा फासणारी आहे. मागील पाच वर्षात पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील भ्रष्टाचाराने कळस गाठला आहे. सर्वसामान्य नागरिकांना भेडसावणारा प्रामुख्याने प्रश्न म्हणजे अपुरा पाणी पुरवठा. पिंपरी चिंचवड शहराला पवना धरणातून पाणीपुरवठा करण्यात येतो. स्वच्छ आणि मुबलक पाणीपुरवठा व्हावा यासाठी पवना धरण ते रावेत पंप हाऊस पर्यंत बंद पाईपलाईनद्वारे पाणीपुरवठा योजना कॉँग्रेसच्या काळात मंजूर करण्यात आली. परंतु मागील पाच वर्षात या योजनेत काहीही प्रगती झालेली नाही. भाजपचे पदाधिकारी शहरात असताना एक बोलतात आणि मावळातील नागरिकांना दुसरे सांगतात. भाजपच्या या दुटप्पीधोरणामुळे शहरवासीयांचे हजारो कोटी रुपये बुडण्याचा धोका निर्माण झाला आहे. मागील पाच वर्षात धरण क्षेत्रात समाधानकारक पाऊस होऊन देखील मागील अडीच वर्षांपासून प्रशासन मात्र शहरवासीयांना दिवसाआड अपुरा, दुषित पाणीपुरवठा करीत आहे. त्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. शहरासाठी आंद्रा, भामा आसखेड धरणातून पाणीपुरवठा करण्याचे प्रकल्प यापूर्वीच मंजूर करून कामास सुरुवात केली आहे. परंतु भाजपच्या भ्रष्ट कारभारामुळे अद्यापही त्या योजना पूर्ण झालेल्या नाहीत. हा प्रशासनाचा नाकर्तेपणा आहे.
लवकरच यावर शहर काँग्रेसच्या वतीने पुन्हा एकदा तीव्र आंदोलन करून निद्रिस्त झालेल्या प्रशासनाला जागे करण्याचे काम काँग्रेस करणार आहे. शहरातील कष्टकरी कामगारांच्या कर रूपी पैशातून शहराचा विकास होत असताना त्यांना सेवा सुविधा देणे हे प्रशासनाचे प्रथम कर्तव्य आहे. शहरातील वाढती वाहतूक विचारात घेऊन पुणे मुंबई महामार्ग 61 मीटर रुंदीकरण काँग्रेसने केला. तसेच शहरातील बारा प्रमुख रस्ते विस्तारित करून बीआरटी बस प्रकल्प राबविण्यात आला. महानगरपालिकेतील भ्रष्ट प्रशासन या मार्गांवर पार्किंग सुविधा उपलब्ध करून देण्याऐवजी पे अँड पार्क योजना राबवित आहे. याचादेखील काँग्रेस पक्ष तीव्र निषेध करीत आहे. शहरात रोज निर्माण होणारा कचरा मोशी कचरा डेपो येथे डम्पीग करण्यात येतो. कचरा समस्या विचारात घेता पुनावळे येथे गायरान जमिनीवर कचरा डेपोचे आरक्षण काँग्रेस पक्षाने टाकले. परंतु मागील पाच वर्षात भाजपला यावर काही करण्याची इच्छाशक्ती झाली नाही. उलट भ्रष्ट प्रशासनाने मोशी तिल कचरा डेपो येथे आगीच्या दूरधटनांकडे जाणीव दुर्लक्ष करण्यात आले. रस्ते साफ सफाईच्या नावाखाली शेकडो कोटीचा भ्रष्टाचार केला. रस्ते रुंदीकरण करण्यात आले आता स्मार्ट सिटीच्या नावाखाली या रस्त्यांवर अनावश्यक पद्धतीने गरज नसतानाही पदपथाचे रुंदीकरण करण्यात येत आहे. यामुळे वाहतूक व्यवस्था सुरळीत होण्याऐवजी वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. शहरातील गोरगरीब नागरिकांना घरकुल मिळावे यासाठी यूपीए-2 चे कार्यकाळात केंद्र सरकारने जेएनएनयूआरएम प्रकल्पांतर्गत पिंपरी चिंचवड शहराला घरकुल योजना मंजूर केली. मागील पाच वर्षात अवघ्या हजार एक घरांची कामे भाजपने केले. हा प्रकल्प सहा हजार आठशे घरांपेक्षा जास्त असताना अद्यापही हजारो नागरिक या प्रकल्पाच्या लाभापासून वंचित आहेत. पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकांना सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुरळीतपणे मिळावी या उद्देशाने पीएमपीएमएलची स्थापना करण्यात आली.
पिंपरी चिंचवड महानगरपालिका दरवर्षी ५४० कोटी रुपयापेक्षा पेक्षा जास्त रक्कम पीएमपीएमएलला संचलन तूट, बस खरेदी, डिझेल, गॅस खरेदीसाठी देते. परंतु भ्रष्टाचारी प्रशासन शहरवासीयांना सक्षम पणे सार्वजनिक वाहतूक व्यवस्था उपलब्ध करून देऊ शकले नाही. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या कार्यकाळात पिंपरी चिंचवड शहराला मेट्रो प्रकल्प मंजूर करण्यात आला. मागील चार वर्षात या मेट्रो प्रकल्पाचे ३० ते ३५ टक्केच काम करून निवडणुकीच्या तोंडावर भाजपाचे भ्रष्ट प्रशासनाने पिंपरी ते फुगेवाडी या अवघ्या सहा किलोमीटर प्रकल्पाचे घाईगडबडीत उद्घाटन उरकण्याचा कारभार केला. प्रकल्पातील अनेक कामे अद्याप प्रलंबित असतानाही अडीच महिन्यांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने मेट्रोचे उद्घाटन केले. याचा देखील त्यावेळी शहर काँग्रेसचे अध्यक्ष डॉ. कैलास कदम यांनी तीव्र आंदोलन करून निषेध केला आहे. अद्यापही मेट्रोचे काम अपूर्णच आहे याचा देखील काँग्रेस तीव्र निषेध करीत आहे. मागील सात वर्षांपूर्वी चिखली येथील आरक्षित जागेवर संतपिठाची स्थापना करण्यात आली. महानगरपालिकेच्या भ्रष्ट कारभार आणि प्रशासनाने संतपिठाच्या मूळ उद्देशालाच हरताळ फासला आहे. या ठिकाणी इंग्लिश माध्यमाचे सीबीसी शाळा खाजगी तत्वावर सुरू करण्यात आली आहे. ही शहरवासीयांची घोर फसवणूक आहे. या पुर्ण प्रकल्पाची चौकशी करण्याची मागणी आपण राज्य सरकारकडे करणार आहोत.
पिंपरी चिंचवड महानगरपालिका येथील नागरिकांना वैद्यकीय सेवा देण्यासाठी मोठे रुग्णालय उभारत आहे. महानगरपालिकेत कॉंग्रेस असताना दिवंगत माजी मंत्री प्रा. रामकृष्ण मोरे यांच्या कल्पनेतून ७५० बेडचे कै. यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय उभारण्यात आले. वाढती लोकसंख्या विचारात घेऊन भोसरी, आकुर्डी, पिंपरी, चिंचवड, सांगवी, यमुनानगर, थेरगाव येथे रुग्णालय उभारण्यात आले आहेत. कोरोना काळात भोसरी मध्ये नवीन रुग्णालय उभारण्यात आले. या रुग्णालयाचा खासगीकरणाचा घाट भाजप प्रशासनाने घातला आहे. महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत काँग्रेसचे अध्यक्ष डॉ. कैलास कदम यांनी या विषयावर तीव्र आंदोलन केल्यामुळे तात्पुरते का होईना या ठिकाणी महानगरपालिकेचे जुने भोसरी रुग्णालय नवीन इमारतीत स्थलांतरित करण्यात आले आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील वैद्यकीय विभागात ठेकेदारी पद्धतीने कर्मचारी भरणे हे चुकीचे आहे. त्याचा काँग्रेस तीव्रपणे निषेध करीत आहे. कोरोना काळात अत्यावश्यक बाब म्हणून पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने ठेकेदारी पद्धतीने कोव्हिड सेंटर उभारले यामध्ये स्पर्श हॉस्पिटलने रुग्ण भरती न करता कोट्यवधी रुपयांचा खर्च महानगरपालिकेकडून वसूल केला यामध्ये लोकप्रतिनिधी, स्थानिक आमदार, प्रशासन आणि ठेकेदारांची ही अभद्र युती झाल्याचे शहरवासीयांना पाहावयास मिळाले. मागील पाच वर्षात पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत भाजपने केलेल्या या भ्रष्टाचारी कारभाराचा जाब काँग्रेस सामान्य जनतेसोबत रस्त्यावर उतरून विचारणार आहे असेही यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेश प्रवक्ते अतुल लोंढे यांनी सांगितले.