शबनम न्युज | पुणे (वृत्तसंस्था)
जागरण गोंधळासारखे धार्मिक विधी करणाऱ्या एका व्यक्तीचे अपहरण करून नुकतेच वारजे परिसरात गोळ्या घालून हत्या करण्यात आली. शनिवारी सकाळी ताम्हिणी घाटात गजानन हवा (वय. 38) याचा मृतदेह आढळून आला.
याप्रकरणी आतापर्यंत दोघांना अटक करण्यात आली असून हत्येचे कारण शोधण्यात येत आहे. वारजे पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गजानन हा दोन दिवसांपूर्वी बेपत्ता झाला होता. त्याच्या कुटुंबीयांनी वारजे पोलिस ठाण्यात हरवल्याची तक्रार दाखल केली. तपासात गजाननचे अपहरण झाल्याची पुष्टी झाली.
पीडित बेपत्ता होण्यापूर्वी त्याच्यासोबत आलेल्या दोन संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले. संशयितांच्या चौकशीत गजाननची गोळ्या झाडून हत्या करून त्याचा मृतदेह ताम्हिणी घाटात टाकल्याचे उघड झाले. पोलिसांच्या पथकाने घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेतला.
या हत्येप्रकरणी सौरभ आमले आणि सौमित्र चव्हाण या दोघांना अटक केल्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक शंकर खटके यांनी सांगितले.पुढील तपास सुरू असून हल्लेखोरांनी वापरलेली बंदुक अद्याप जप्त करण्यात आलेली नाही, असे ते म्हणाले.