आळंदी: शरदचंद्र पवार कला आणि वाणिज्य महाविद्यालय, डुडुळगाव आळंदी, पुणे या ठिकाणी राष्ट्रीय सेवा योजना, विद्यार्थी विकास मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने शिवस्वराज्यभिषेक दिनाचे औचित्य साधून गीतगायन,पोवाडा व व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरुवात दिपप्रज्वलन, प्रतिमापूजन आणि कु.पायल घोडके हिच्या स्वागत गीताने झाली. पाहुण्यांचा परिचय प्रा. कैलास अस्तरकर यांनी करून दिला.
या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे व व्याख्याते प्रा. परमेश्वर भताशे- इतिहास विभाग प्रमुख यांनी शिवस्वराज्यभिषेक साजरा करण्याची कारणे व या दिवसाचे महत्व विस्ताराने मांडून शहाजी महाराजांचे स्वप्न छत्रपती शिवाजी महाराजांनी कसे पूर्ण केले याबाबत सखोल मार्गदर्शन केले. स्वप्नाला प्रत्यक्षात उतरविणे म्हणजेच वास्तव असून स्वप्न आणि वास्तव यात वाद झाल्याशिवाय वास्तव हे श्रेष्ठ ठरू शकत नाही हे विविध उदाहरणे देत स्पष्ट केले. छत्रपती शिवाजी महाराज क्षत्रिय नसल्याने त्यांना आलेल्या अनंत समस्या व त्या समस्यांची त्यांनी कशी सोडवणूक केली, याचे स्पष्टीकरण केले. तसेच क्षेत्रीय नसलेली व्यक्तीसुद्धा राजा होऊ शकते हे त्यांनी आपल्या कार्यकर्तृत्वाने दाखवून दिले. छत्रपती शिवाजी महाराजा कडे न्यायप्रियता, लोककल्याण, न्यायनिवाडा, दानशूरता , समय सूचकता व निसर्गप्रेमी हे किती अनमोल गुण होते हे स्पष्ट करीत प्रत्येक तरुणाने आज त्यांच्या गुणांचा वसा आणि वारसा चालण्याची गरज व्यक्त केली.
अध्यक्षीय समारोप करतांना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. हंसराज थोरात यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वातंत्र्य, समता, बंधुत्व व न्याय या चतुसूत्रीचा राजपदावर विराजमान असतांना कसा वापर केला यासंदर्भात विवेचन करीत त्यांच्याकडे असलेले कौशल्य, मानवी मूल्य, श्रमप्रतिष्ठा, राष्ट्रभक्ती या महत्त्वपूर्ण मूल्यांची जपणूक तरुण वर्गाने करण्याची गरज व्यक्त करीत शिवाजी महाराज हे स्वधर्म चिकित्सक, उत्तम प्रशासक,अंधश्रद्धा विरोधक, उत्तम अभियंता व जलतज्ञ असे बहुआयामी व्यक्ती होते हे विविध उदाहरणासह स्पष्ट करून त्यांची जयंती, पुण्यतिथी व स्वराज्य भिषेक दिन साजरा करण्याबरोबरच त्यांचे बहुमोल विचार अंगीकृत करण्याची गरज व्यक्त केली.
या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी श्री गजानन महाराज शिक्षण प्रसारक मंडळाचे खजिनदार मा. श्री. मयूर मुरलीधर ढमाले यांचे अनमोल मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. दिलीप बारी यांनी केले व प्रास्ताविक प्रा.डॉ. रणजित कदम यांनी केले तर उपस्थितांचे आभार प्रा. संजीव कांबळे यांनी मानले. कार्यक्रमासाठी प्रा. डॉ. पांडुरंग मिसाळ, प्रा. माणिक कसाब,प्रा. शाहूराज येवते ,प्रा. डॉ. राजू सिरसकर, प्रा. विश्वनाथ व्यवहारे,प्रा. प्रेरणा पाटील,प्रा.दिपाली सोनवणे, प्रा. सोनाली तापकीरप्रा.यशोदा खुळखुळे इत्यादी विभाग प्रमुख, सहाय्यक प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी आणि महाविद्यालयातील सर्व शाखेतील विद्यार्थी उपस्थित होते. या कार्यक्रमाची सांगता सामुदायिक पसायदानाने झाली. अशी माहिती महाविद्यालयाचे प्रसिद्धी विभाग प्रमुख, प्रा. प्रविण डोळस यांनी दिली.