तिरंगा लावण्यासाठी घर द्या – दिव्या जोशी
शबनम न्युज | पुणे
सध्या घरोघरी तिरंगा या मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन भारत सरकार करत आहे. दरम्यान घरच नाही तर तिरंगा लावू कुठे? असा संतप्त सवाल पुण्यातील विद्यार्थिनी दिव्या अजय जोशी हिने पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री शिंदे यांना निवेदनाद्वारे केला आहे.
दिव्या जोशी ही पुण्यातील औंधमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयातील विद्यार्थिनी आहे. तिने आपल्या निवेदनात म्हंटले आहे कि, आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे पूर्ण झाली, म्हणून आपण अमृत महोत्सव साजरा करत आहोत .आणि त्या निमित्ताने भारत सरकार “हर घर तिरंगा” नामक एक मोहीम राबवत आहे ,तर त्या मोहिमेत मलाही सहभाग नोंदवायचा आहे.
परंतु माझी आर्थिक परिस्थिती पाहता मला तिरंगा घेणे शक्य आहे पण माझ्याकडे घर नाही त्यामुळे माननिय पंतप्रधान यांना माझी विनंती आहे की या मोहिमेत सहभाग घेण्यासाठी आपण मला घर मिळवून देण्यात किंवा घेण्यात मदत करावी.
कारण माझ्या परिवारात मी, माझी आई ,माझा लहान भाऊ आणि माझी मोठी बहीण असे चौघे जण आहोत .आणि मी आणि माझी मोठी बहीण कमवतो पण येणाऱ्या पगारात वाढत्या महागाईमुळे दैनंदिन खर्च देखील भागत नाही. त्यामुळे मी अशी अपेक्षा करते की आपण मला घर घेण्यासाठी आर्थिक सहाय्य करून भारताच्या ७५ व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त मा.पंतप्रधान नरेंद्र जी मोदी साहेब हे जी मोहीम राबवत आहेत. “हर घर तिरंगा” त्यात मलाही सहभाग घेऊन भारताचा स्वातंत्र्य दिन आनंदाने साजरा करायचा आहे ,व मला भारताची मान उंचावण्यासाठी प्रोत्साहन करावे, असे सदर निवेदनात दिव्याने नमूद केले आहे.