पुण्यात आयोजित सहजीवन व्याख्यानमालेत राज ठाकरे यांची अनेक मुद्द्यांवर चर्चा
शबनम न्युज | पुणे
“समाजकारणाला राजकारणाची धार हवीच, स्वतः राजकारणात उतरल्याशिवाय नवं काहीही घडणार नाही, तुम्ही स्वतः राजकारणात आल्याशिवाय, तुम्ही स्वतः अस्तित्व निर्माण केल्याशिवाय काहीही घडणार नाही.” असे मत राज ठाकरे यांनी व्यक्त केले. ते पुण्यात मुक्तांगण बालरंजन केंद्र येथे आयोजित सहजीवन व्याख्यानमालेत बोलत होते.
यावेळी बोलताना राज ठाकरे यांनी अनेक मुद्द्यांवर चर्चा केली. तसेच तरुणांनी राजकारणात सहभाग घ्यायला हवा, आताचे तरुण हे राजकारणापासून दूर जाताना दिसत असल्याची प्रतिक्रिया राज ठाकरेंनी व्यक्त केली. जास्तीत जास्त तरुणांनी राजकारणात यावे, असे आवाहन ही राज ठाकरे यांनी केले.
तसेच पुढे बोलताना, राज ठाकरे म्हणाले, “राजकारणामध्ये येणं म्हणजे फक्त निवडणुकीमध्ये उभं राहणं नव्हे, तर पेशन्स ठेवावे लागते. माझ्यासोबत पक्ष स्थापनेच्या वेळेला अनेक लोक आले होते आणि आता गळलेही. तरी काय झाले नाही. राजकारण हे वाईट नाही, राजकारण हे तुमच्याशी निगडित आहे, राजकारण हे तुमच्या येणाऱ्या पिढ्यांशी निगडित आहे, राजकारण हे वाईट नाहीये ते नासवलं जातंय, राजकारण चुकीच्या लोकांच्या हातात पडलंय,” अशी टीकाही राज ठाकरे यांनी केली आहे.
बाहेरचे लोक महाराष्ट्रात येऊन मोठे झाले –
‘बाहेरचे लोक महाराष्ट्रात येऊन मोठे झाले आणि आपले लोक थंड बसलेत,’ असे वक्त्यव्य राज ठाकरेंनी केले. ते म्हणाले, ”
आपला महाराष्ट्र हा सुसंस्कृत आहे. तो जर यूपी, बिहार प्रमाणे जाती-पातीमध्ये बरबाद व्हायला लागला तर कुठे घेऊन जाणार आपण हा राज्य. ज्या राज्यामध्ये बाहेरची लोक व्यवसाय करण्यासाठी येतात. असा आपला सुसंस्कृत महाराष्ट्र आहे.” काहीदिवसांपूर्वी राज्यपाल कोश्यारी यांनी महाराष्ट्राबद्दल केलेल्या वक्तव्यावर देखील राज ठाकरेंनी प्रतिक्रिया देताना म्हणाले, ” राज्यपाल कोश्यारी म्हणाले होते कि, महाराष्ट्र मधील गुजराती आणि मारवाडी परत निघून गेले तर महाराष्ट्र काय करेल? तर गुजराती मारवाडी यांच्या राज्यात काही होत नाही, म्हणून ते आपल्या राज्यात आलेत, या महाराष्ट्राची सांस्कृतिक किंवा अनेक जी जडणघडण झालेली आहे, यामुळे बाहेरचे लोक महाराष्ट्रामध्ये आले, उद्योगपती झाले, व्यवसायिक झाले, मोठे झाले, आणि आपले लोक थंड बसले आहेत.”
विधानसभेच्या चर्चा ऐकाव्याशा वाटत नाहीत –
“विधानसभेत जे गोंधळ चालले आहे, जी चर्चा चालली आहे आता ती ऐकावीशी वाटत नाही, मूळ प्रश्न सोडून दिलेत आणि बाकीच्या मुद्द्यावरून विधानसभेत गोंधळ चालला आहे.” तसेच ‘मूळ प्रश्नांना हात घाला, वायफळ प्रश्नांना सोडा,’ असा सल्ला ही राज ठाकरे यांनी विधानसभेमधील गोंधळावरून दिला आहे.
परदेशी कंपन्यांनी भारताला टू-व्हीलरचा डम्पिंग ग्राउंड बनवलंय –
पुणे शहराच्या रस्त्याच्या प्रश्नांसंदर्भात बोलताना राज ठाकरे म्हणाले, “पुणे शहरातील लोकसंख्या पाहता येथे १५ टक्के तरी रस्ते असणे आवश्यक होते, परंतु येथे फक्त ८ ते ९ टक्के रस्ते आहेत. पुण्यामध्ये ४० लाख टू व्हीलर आहेत, पुण्याची ही मुंबई सारखीच अवस्था झाली आहे. आपण मेट्रोला खर्च करतो, आपण ब्रिज बांधत आहोत, परंतु याने पायाभूत सुविधांचा प्रश्न सुटणार नाही. जोपर्यंत मोटर सायकलवर बंदी येत नाही, तोपर्यंत हे प्रश्न जगात सुटणार नाही तर मग आपल्याकडे काय सुटणार, तसेच परदेशी कंपन्यांनी आपल्या देशाला टू व्हीलर चा डम्पिंग ग्राउंड बनवून ठेवलेला आहे. अशी टीका ही राज ठाकरेंनी यावेळी बोलताना केली.