शबनम न्युज | पुणे
आरटीई प्रवेश प्रक्रियेद्वारे विद्यार्थ्यांचे प्रवेश घेण्यासाठी पोर्टरच्या तांत्रिक अडचणींमुळे पालकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे पालकांची धावपळ सध्या सुरू आहे. आरटीइचे प्रवेश 8 मे पर्यंत घेता येणार आहेत. मात्र, बुधवार (दि. 3) पर्यंत शहरात फक्त 37%च प्रवेश झाले. त्यामुळे राहिलेले प्रवेश होतील का? याची धाकधूक पालकांमध्ये होत आहे.
बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 अन्वये, दरवर्षीप्रमाणे 25 टक्के प्रवेश प्रक्रिया संपूर्ण राज्यात ऑनलाइन पद्धतीने राबविण्यात येते. त्यानुसार 2023-24 च्या शैक्षणिक वर्षासाठी आरटीई 25 टक्के प्रवेश प्रक्रिया अंतर्गत ऑनलाइन सोडत 5 एप्रिलला निवड झालेल्या पालकांनी 13 ते 25 एप्रिल या कालावधीत प्रवेश निश्चित करावा, असे सांगितले होते. मात्र सर्वर डाऊन असल्यामुळे दिलेल्या मुदतीत बालकांचे प्रवेश निश्चित करता आले नाही. त्यामुळे बालकांचे प्रवेश घेण्यासाठी मुदतवाढ 8 मे पर्यंत दिली होती. मात्र, आतापर्यंत फक्त 37 टक्केच प्रवेश झाले आहेत. त्यामुळे पालकांमध्ये चिंता निर्माण होत आहे.