शबनम न्युज | मुंबई
ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी नुकतेच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष पदावरून निवृत्त होण्याची घोषणा केली. मात्र शरद पवार यांनी पद सोडू नये, यासाठी कार्यकर्ते भावुक झाल्याचे पहावयास मिळाले. पक्षातील सहकारी आणि नेतेही शरद पवार यांना पद न सोडण्याबाबत आग्रह करत आहेत, त्यामुळे शरद पवार आपला निर्णय बदलणार का? यावर सगळ्यांचे लक्ष लागले आहे. मात्र, तरीही शरद पवार हे आपल्या निर्णयावर ठाम असल्याची माहिती समोर येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना ही माहिती दिली.
ते म्हणाले, “राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी निवृत्तीचा निर्णय नुकताच जाहीर केला होता आणि ते आपल्या निर्णयापासून ढळलेले नाही, त्यांची ही भूमिका अद्यापही कायम आहे. मात्र, महाराष्ट्रातील विविध कार्यकर्त्यांनी त्यांच्याशी संपर्क करून हा निर्णय घेऊ नये, असा आग्रह केला. देशातील अनेक राज्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि नेतेही त्यांना हेच सांगत आहेत, मात्र शरद पवार हे आपल्या निर्णयावर ठाम आहेत. मी प्रदेशाध्यक्ष या नात्याने पक्षाच्या कार्यकर्त्याची आणि पदाधिकाऱ्यांची भूमिका शरद पवार यांच्यापर्यंत पोहोचवत आहे तसेच त्यांची भूमिका काय आहे हे सांगण्याचं काम मी केलं आहे, येणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीपर्यंत तरी शरद पवार यांनी अध्यक्ष पद सांभाळावे, अशी महाराष्ट्रातल्या असंख्य कार्यकर्त्यांची तरुणांची भावना आहे.