शबनम न्युज | मुंबई
काँग्रेसची लाट सुरू झाली आहे, असं म्हणायला हरकत नाही. 110 पर्यंत जागा मिळतील असं वाटलं होतं, पण कर्नाटकच्या जनतेने मोठ्या प्रमाणात दाद दिली, आपल्या देशातील जनतेचा पिंड सर्वधर्मसमभावाचा आहे, तुम्ही कितीही जात-पात, धर्म वापरा, पण आपला पिंड संपू शकणार नाही, अशी प्रतिक्रिया कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर काँग्रेसच्या नेत्या प्रणिती शिंदे यांनी आज माध्यमांशी संवाद साधताना दिली.
कर्नाटक मध्ये काँग्रेसला एक हाती सत्ता मिळाली आहे. भाजपच्या पारंपारिक मतदारसंघातही काँग्रेसने मुसंडी मारली असून, भाजपाच्या मंत्रांनाही पराभव स्वीकारावा लागला आहे. काँग्रेसच्या या विजयाचा देशभर कौतुक केले जात आहे. दरम्यान काँग्रेसच्या नेत्या प्रणिती शिंदे यांनी यावर आपले प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
त्या म्हणाल्या, लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत दोन वेळा जनतेने चेंज म्हणून भाजपाला निवडून आणलं होतं, पण जनतेला धर्मावरून वेगळे करू शकत नाहीत, कारण आम्ही देशाच्या संविधानावर विश्वास ठेवणारे आहोत, आम्ही गांधींवर विश्वास ठेवणारे आहोत, गोरगरिबांचा आवाज काँग्रेस पक्ष आहे, काँग्रेस शिवाय तळागाळापर्यंत काम करणारा पक्ष राहिला नाही, हे कर्नाटकातील लोकांना कळून चुकलं आहे, छत्तीसगड राजस्थान मध्येही हेच दिसले, महागाई, बेरोजगारी हे आमचे मुद्दे होते, कारण याचा चटका तुम्हा आम्हाला सर्वांना बसतोय, याच मुद्द्यावरून आम्ही लढलो, काँग्रेसने कधीच कोणती वैयक्तिक टीका केली नाही गोरगरिबांचा प्रश्न ऐरणीवर आणला देशांचा पिंड सर्वधर्मसमभाव आहे तर कर्नाटकचा पिंड काँग्रेसी आहे. म्हणून उमेदवार कोणीही असो त्यांनी ठरवलं होतं की यावेळी काँग्रेसला जिंकून आणायचं असेही त्या म्हणाल्या.