शबनम न्यूज पिंपरी चिंचवड प्रतिनिधी
पिंपरी : पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दीतील चौका चौकातील व रस्त्याच्या बाजूला आजही शेकडो जाहिरात होर्डिंग उभी आहेत. अशी धोकादायक असणारे आणि कोसळलेले जाहिरातीचे होर्डिंगचे स्ट्रक्चरल ऑडीट केले का? याचीसुध्दा सविस्तर माहिती जनतेसमोर आली पाहिजे. आता उभ्या असणाऱ्या होर्डिंगला परवानगी दिली असल्यास अथवा संबंधितांनी परवानगी मागितली असल्यास परवानगीच्या प्रस्तावाप्रमाणेच होर्डिंग उभारले आहे का ? होर्डिंग अनाधिकृत असल्यास त्याबाबत कोणती कारवाई केली. तसेच कोणतीही कारवाई केली गेली नसल्यास त्याबाबत कोण जबाबदार कोण ? अश्या अनेक प्रश्नांची उत्तरे प्राप्त करण्यासाठी तातडीने सखोल चौकशी अहवाल जनतेसमोर मांडावा अशी मागणी माझी विरोधी पक्षनेते नाना काटे यांनी आयुक्त शेखर सिंह यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
काटे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,
पिंपरी चिंचवड शहरात अवकाळी पावसामुळे किवळे येथे होर्डिंग दुर्घटना घडली. यामध्ये ५ व्यक्तींना प्राण गमवावा लागला होता. त्यानंतर ४ दिवसापूर्वी हिंजवडी परिसरात ही होर्डिग कोसळल्याची दुर्घटना घडली. त्यामुळे शहरात अनधिकृत होर्डिंगचा प्रश्न ऐरणी वरती आहे. मात्र, महापालिकेच्या अधिकाऱ्याकडून अनेक भागात कारवाईचा केवळ फार्स केला जातो आहे. आजही शहरात अनेक भागात धोकादायक पद्धतीने होर्डिंग जैसे थे आहेत. यावरती महापालिका कधी कारवाई करणार की नागरिकांच्या जीवाशी खेळणार असा प्रश्न काटे यांनी उपस्थित केला आहे.
शहरातील चौकाचौकात अनेक होर्डिंगचा सुळसुळाट झाला आहे. होर्डींग वरती कारवाई करताना महापालिकेच्या अधिकाऱ्याकडून होर्डिंग चालकाला मदत केली जात आहे. कारण होर्डिंगवरती अवकाळी पावसामुळे कारवाई होऊ नये यासाठी अनेक होर्डिंग चालकांनी आपले होर्डिंग वरील फ्लेक्स उतरवून ठेवले आहेत. शहरातील अनेक चौकामध्ये रस्त्यापासून अवघ्या पाच ते दहा फुटाच्या अंतरावरतीच होर्डिंगचे जाळे उभारले असल्याचे दिसून येते. अनेक होर्डिंग चालकांनी किवळे येथील घटनेनंतर पालिकेतील संबंधित अधिकारी यांच्याशी संपर्क साधून कारवाई न होण्यासाठी भेटीगाठी केल्या असे निदर्शनास येत आहे. मात्र होर्डिंग दुर्घटनेत जीव जाणाऱ्या सामान्य नागरिकांच्या जीवाशी खेळ करणाऱ्या महापालिका अधिकारी यांच्यावरती कारवाईचा बडगा उभारणे गरजेचे आहे. अन्यथा रस्त्यावरून येणारा जाणारा माझा सामान्य नागरिक यांच्या मनात कायम भीतीचे वातावरण राहणार आहे असे नाना काटे यांनी म्हटले आहे.