शहरातील युवा कार्यकर्ते सुनिल गव्हाणे आणि मयूर जाधव यांच्या पक्षांतर्गत पाठपुराव्याला यश
शबनम न्युज | पिंपरी चिंचवड
सकल मातंग समाज महाराष्ट्र राज्याच्या वतीने विविध प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी पुणे ते मुंबई “दवंडी यात्रेचे” आयोजन करण्यात आले होते. १८ जुलै रोजी पुणे संगमवाडी येथून या यात्रेचा प्रारंभ होऊन २ दिवसानंतर मुंबईतील आझाद मैदान येथे प्रचंड आंदोलनाने या दवंडी यात्रेचा समारोप झाला. यावेळी हजारोंच्या संख्येने मातंग समाज बांधव उपस्थित होते. या आंदोलनाला राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनिल गव्हाणे आणि राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाचे प्रदेश उपाध्यक्ष मयूर जाधव यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना या आंदोलनाला भेट देऊन आंदोलनकर्त्यांचे म्हणणे ऐकून घेण्याची विनंती केली होती.
अनुसूचित जाती मध्ये अ ब क ड निहाय आरक्षणाचे वर्गीकरण करावे. बार्टीच्या धर्तीवर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे प्रशिक्षण व संशोधन संस्था (आर्टी) स्थापन करावी. क्रांतिवीर लहुजी साळवे मातंग समाज अभ्यास आयोगाची संपूर्ण अंमलबजावणी करावी. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाचा ९ वर्षाचा थकीत निधी देऊन महामंडळ पूर्ण क्षमतेने चालू करावे. शहीद संजयभाऊ ताकतोडे यांच्या कुटुंबाला संपूर्ण शासकीय मदत देऊन कुटुंबाचे पुनर्वसन करावे. ई. मागण्या यावेळी करण्यात आल्या.
सध्या सुरू असलेल्या अधिवेशनात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सकल मातंग समाजाच्या मागण्या नक्कीच उपस्थित करेल आणि त्याबरोबरच सरकारला या मागण्या संदर्भात स्वतंत्र बैठक आयोजित करायला भाग पाडेल अशी आश्वासन प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सर्व आंदोलनकर्त्यांना दिली होते.
सदर आश्वासनाचा पक्षांतर्गत पाठपुरावा शहरातील युवा कार्यकर्ते सुनिल गव्हाणे आणि मयूर जाधव केला. यामुळे दिनांक २५ जुलै २०२३ रोजी, जयंत पाटील साहेबांनी याबाबतीत मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले आहे. आता लवकरच बैठकीचे आयोजन सरकार करेल हि अपेक्षा आहे.