शबनम न्युज | पुणे
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आज पुण्यात लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते नरेंद्र मोदींना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी खास या पुरस्कार सोहळ्यासाठी पुण्यात आले असले तरी त्यांनी कार्यक्रमस्थळी पोहोचण्याआधी पुण्यातल्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचं दर्शन घेतले. तिथे अभिषेकही केला. त्यांनतर लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार प्रदान कार्यक्रमात त्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. पुरस्कार स्वीकारल्यानंतर त्यांनी समस्त पुणेकरांचं आणि महाराष्ट्रातील जनतेचे आभार मानले. यावेळी त्यांनी पुणे आणि काशी यांच्यातील एक साम्यही आपल्या भाषणात स्पष्ट केले.
नरेंद्र मोदी जेव्हा जेव्हा महाराष्ट्रात एखादं भाषण करतात, तेव्हा त्या भाषणाची सुरुवात मराठीतून करतात. आजही त्यांनी मराठीतून भाषणाची सुरुवात केली. यावेळी बोलताना ते म्हणाले,
मी इथे येण्याआधी पुण्यातल्या प्रसिद्ध श्रीमंत दगडूशेठ हलवाई मंदिरात जाऊन गणपतीचे आशीर्वाद घेतले. हे मंदिर पुणे जिल्ह्याच्या इतिहासाचा महत्त्वाचा भाग आहे. दगडूशेठ हे पहिले व्यक्ती होते, ज्यांनी लोकमान्य टिळकांच्या आवाहनानंतर सार्वजनिक गणेशोत्सवात सहभाग नोंदवला आणि सार्वजनिकरित्या गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना केली. मी या पावन भूमीला आणि या भूमीत जन्माला आलेल्या विभूतींना नमन करतो.
“आपल्या देशात काशी आणि पुण्याला विशेष ओळख आहे. पुणे आणि काशीत विद्वत्ता चिरंजीव आहे. येथे विद्वत्तेला अमरत्व प्राप्त झाले आहे. पुणे नगरी विद्वत्तेची दुसरी ओळख आहे. अशा भूमित सन्मानित होणं यापेक्षा गर्वाची दुसरी गोष्ट नाही.”
“कोणताही पुरस्कार मिळतो तेव्हा आपली जबाबदारीही वाढते. या पुरस्कारासाठी टिळकांचं नाव जोडलं असेल तर दायित्व कित्येक पटीने वाढतं. लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार मी देशातील १४० देशवासियांच्या चरणी समर्पित करतो. मी देशवासियांना विश्वास देतो की त्यांच्या सेवेत त्यांची आशा, अपेक्षांच्या पूर्तीसाठी कोणतीही कसर बाकी ठेवणार नाही, असं आश्वासनही मोदींनी दिलं.