शबनम न्युज | नवी दिल्ली (वृत्तसंस्था)
केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी राहुल गांधीवर सभागृहात फ्लाईंग किस दिल्याचा आरोप केला आहे. त्यानंतर भाजपा महिला खासदार आक्रमक झाल्या आहेत. संसदेतील २२ महिला खासदारांनी राहुल गांधींविरोधात पत्राद्वारे तक्रार केली आहे. त्यामुळे राहुल गांधींवर कारवाई होण्याची शक्यता आहे.
स्मृती इराणी म्हणाल्या, “माझा एका गोष्टीवर आक्षेप आहे. ज्यांना माझ्याअगोदर बोलण्याची संधी देण्यात आली होती, त्यांनी जाण्यापूर्वी असभ्यता दाखवली. संसदेत बसलेल्या महिला सदस्याला फ्लाइंग किस दिली, असे अशोभनीय वर्तन यापूर्वी देशाच्या संसदेत कधीही पाहिले नव्हते,” असा आरोप त्यांनी यावेळी केला आहे.
यावेळी बोलताना त्या म्हणाल्या, पहिल्यांदाच देशाच्या इतिहासात भारत मातेची हत्या करण्याचं विधान करण्यात आले. जे भारत मातेच्या हत्येवर टाळ्या वाजवतात त्यांच्या मनात देशासाठी काय आहे याचे संकेत मिळाले. मणिपूर खंडीत नाही. देशाचा हिस्सा आहे. भारताचा अर्थ उत्तर भारत आहे असं तामिळनाडूत तुमच्या सहकारी पक्षाने सांगितले. राहुल गांधींमध्ये हिंमत असेल तर डीएमकेसोबत युती तोडून दाखवावी. जे काश्मीरला भारतापासून वेगळे करण्याची भाषा करतात त्यांना तुम्ही रोखत नाही, असे ही त्यावेळी म्हणाल्या.