शबनम न्यूज | प्रातिनिधी
मराठा समाजाला सरसकट ‘कुणबी’ असे जातीचे दाखले देण्याची मागणी करत मनोज जरांगे पाटील गेल्या १४ दिवसांपासून जालना जिल्ह्यात उपोषणाला बसले आहेत. त्यांनी उपोषण मागे घ्यावं, असं सरकारकडून सातत्याने आवाहन होत असलं तरीही त्यांनी उपोषण सुरूच ठेवण्याचा निर्धार केला आहे. दरम्यान, कालपासून (१० सप्टेंबर) जरांगे पाटलांनी पाणी आणि औषधाता त्याग केला असून वैद्यकीय तपासणी करण्यासही विरोध केला आहे.
गेल्या १४ दिवसांत बऱ्याच घडामोडी घडून गेल्या. शांततेत सुरू असलेल्या मराठा समाजाच्या आंदोलनावर पोलिसांनी १ सप्टेंबर रोजी लाठीमार केला. या लाठीमाराचे पडसाद महाराष्ट्रभर उमटले.
सरकारनेही तातडीने आदेश काढून निजामकाळात कुणबी नोंद असलेल्या मराठा समाजातील वारशांना कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे असा जीआर सरकारने काढला. या जीआरनंतर तरी जरांगे पाटील उपोषण मागे घेतील अशी सरकारची धारणा होती. परंतु, जीआरमधील वंशावळ शब्द काढून तिथं सरसकट हा शब्द टाकावा या मागणीसाठी जरांगे पाटील आग्रही राहिले. कारण, सरकारने काढलेल्या जीआरचा मराठा समाजाला काहीच फायदा होणार नसल्याचे सांगत त्यांनी आपली मागणी लावून धरली.
मनोज जरांगे पाटलांनी सरकारला चार दिवसांचा अल्टिमेटम दिला होता. चार दिवसांत सरकारने मागण्या मान्य नाही केल्यातर पाणी आणि औषधांचा त्याग करण्याचा इशारा दिला होता. चार दिवसांचा अल्टिमेटम उलटून गेल्यावरही सरकारने त्यांच्या मागण्या मान्य न केल्याने कालपासून त्यांनी पाणीत्यागही केला आहे. तसंच, औषधं घेण्यास नकार दिला असून डॉक्टरांनी लावलेल्या सलाईन काढून टाकल्या आहेत. जरांगे पाटलांची प्रकृती बिघडल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.
मराठा आरक्षण आंदोलनाची व्याप्ती वाढू लागल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज, सोमवारी सर्वपक्षीय नेत्यांची बैठक आयोजित केली आहे. या बैठकीत मराठा आरक्षणाबाबत सरकार करीत असलेल्या प्रयत्नांची माहिती सर्वपक्षीय नेत्यांना देण्यात येणार असून, त्यांच्या माध्यमातून मनोज जरांगे यांनी उपोषण सोडावे यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. या बैठकीला विरोधी पक्षांचे नेते आणि जरांगे कसा प्रतिसाद देतात याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.