राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्राच्या धरतीवर रोहित पवार यांची युवा संघर्ष यात्रा
रोहित पवार यांची युवा संघर्ष यात्रा दहा जिल्हे व 28 तालुक्यातून जाणार
पिंपरी चिंचवड शहरातून पहिल्या टप्प्यात अडीच हजार युवक होणार सहभागी
शबनम न्यूज | प्रतिनिधी | पिंपरी चिंचवड
पिंपरी : राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे नेते खासदार राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रा सुरू केली होती, या भारत जोडो यात्रेदरम्यान देशभरातील नागरिकांना राहुल गांधी यांनी भेट दिली. त्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या, संपूर्ण देशात ही भारत जोडो यात्रा चर्चेचा विषय ठरली, या भारत जोडो यात्रेमुळेच राहुल गांधी हे देशाचे नेतृत्व करण्यास सक्षम नेते आहेत याची प्रचिती देशवासीयांना आली. भारतीय जनता पार्टी वतीने राहुल गांधी यांना कितीही अपमानित केले गेले तरी या भारत जोडो यात्रेमुळे राहुल गांधी यांची एक वेगळीच प्रतिमा देशभरात तयार झाली आहे. आगामी 2024 मधील निवडणुकीत नरेंद्र मोदी यांच्या विरोधात फक्त राहुल गांधी यांचेच नाव या भारत जोडो यात्रेमुळे पुढे आले.
महाराष्ट्रात रोहित पवार हे राष्ट्रवादीचे कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघाचे आमदार आपली युवा संघर्ष यात्रा घेऊन येत आहे. रोहित पवार यांची युवा संघर्ष यात्रा दहा जिल्हे व 28 तालुक्यातून जाणार आहेत याबाबतची संपूर्ण माहिती रोहित पवार यांनी पिंपरी चिंचवड शहरातील एका आयोजित पत्रकार परिषदेत दिली. ज्याप्रमाणे राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रा दरम्यान अनेक युवकांचे संघटन केले व संपूर्ण देशवासीयांचा पाठिंबा मिळविला त्याचप्रमाणे महाराष्ट्रात रोहित पवार आपल्या या युवा संघर्ष यात्रेच्या निमित्ताने आपली जादू चालविणार आहेत.हि पदयात्रा पुणे ते नागपूर अशी असणार असून या पदयात्रेत 200 कार्यकर्ते रोहित पवार यांच्यासोबत चालणार आहेत.
ही पदयात्रा युवकांना संघटित करून एकत्रित आणण्यासाठी आणि महाराष्ट्रातील तरुणांच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचे प्रतीकात्मक परंतु शक्तिशाली साधन असल्याचे रोहित पवार यांनी सांगितले. तसेच सरकारने निर्णायक पाने कार्य करणे आणि विविध समस्यांचे त्वरित निराकरण करणे आवश्यक आहे, यावर या यात्रेत भर देण्यात येणार आहे. युवा संघर्ष यात्रा ही युवा पिढीच्या इच्छा आकांक्षा पूर्ण करण्यासाठी आणि त्यांच्या भविष्याला मूर्त रूप देण्यासाठी युवकांनी सुरू केलेली एक प्रभावी चळवळ असल्याचे रोहित पवार यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. तसेच या युवा संघर्ष यात्रेचा एक भाग आणि युवांचे प्रतिनिधी म्हणून आमदार रोहित पवार हे अनेक युवां सोबत पुणे ते नागपूर पायी चालत जाणारा असून राज्यातील युवां पुढील आव्हाने सोडविण्यासाठी जनतेमध्ये सक्रियपणे सहभागी होणार आहेत. संपूर्ण पदयात्रेदरम्यान जनतेला मुख्यत्वे युवांना त्यांच्या समस्या आणि अपेक्षा व्यक्त करण्याची संधी या यात्रेत मिळणार आहे .आणि ज्या मुद्द्यांना प्राधान्य दिले पाहिजे अश्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चाही करता येणार आहे. नागपुरात यात्रेची सांगता झाल्यावर राज्यभरातून युवांनी केलेल्या मागण्यांकडे आमदार रोहित पवार विधानसभेच्या नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात हे मुद्दे मांडणार असून या मुद्यांकडे सरकारचे लक्ष वेधणार आहेत.
नक्कीच आमदार रोहित पवार हे राहुल गांधी यांच्यासारख्या नेत्यांच्या पावलावर पाऊल टाकत महाराष्ट्रात युवा संघर्ष यात्रेच्या निमित्ताने राष्ट्रवादी पक्षाची पाळीमुळे घट्ट करणार आहेत आगामी काळात रोहित पवार यांना या युवा संघर्ष यात्रेच्या निमित्ताने अभूतपूर्व यश मिळाले तर शरद पवार गटाचे राष्ट्रवादी आगामी येणाऱ्या सर्वच निवडणुकांमध्ये आपला करिष्मा दाखविणार यात शंका नाही.
मंगळवारी (दि.१७) पिंपरी येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत यावेळी माजी महापौर व जेष्ठ नेते आझमभाई पानसरे, पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे शहराध्यक्ष तुषार कामठे, माजी नगरसेविका सुलक्षणा शिलवंत -धर, शकुंतला भाट, जनाबाई जाधव, माजी नगरसेवक गणेश भोंडवे, युवक शहराध्यक्ष इमरान शेख, महिला शहराध्यक्ष ज्योती निंबाळकर, प्रदेश पदाधिकारी रविकांत वर्पे, काशिनाथ नखाते, शहर प्रवक्ते माधव पाटील, ज्येष्ठ नेते शिरीष जाधव, देवेंद्र तायडे, जयंत शिंदे, राहुल आहेर, सागर तापकीर, प्रशांत सपकाळ, मयूर जाधव, राहुल पवार स्वप्नाली असोले आदी उपस्थित होते.
यावेळी आ. रोहित पवार यांनी सांगितले की, 24 ऑक्टोबर रोजी पुण्यातील महात्मा फुले स्मारक समताभुमी येथे अभिवादन करून वीर लहुजी वस्ताद साळवे तालीम ते टिळक स्मारक मंदिर या परिसरातून युवा संघर्ष यात्रेस प्रारंभ करण्यात येणार आहे. 25 ऑक्टोबरला तुळापूर येथील छत्रपती संभाजी महाराज यांच्या समाधी स्थळापासून फुलगाव, वढु खुर्द, वढू बुद्रुक, कोरेगाव भीमा मार्गे सनसवाडी भैरवनाथ मंदिर येथे पदयात्रा काढण्यात येणार आहे. यानंतर पुणे जिल्ह्यातील शिरूर मार्गे अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा, कर्जत, जामखेड, बीड जिल्ह्यातील पाटोदा, जवळा, पिंपळनेर, गेवराई, जातेगाव, घनसांगवी, जालना जिल्ह्यातील मुद्रेगाव फाटा, कुंभार पिंपळगाव, परतुर, परतुर, मंठा, नांदशी फाटा मार्गे परभणी जिल्ह्यातील सेलू, जिंतूर चारठाणा, मालेगाव फाटा, माणकेश्वर, मार्गे हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव, नागेश्वर महादेव मंदिर हत्ता, सेनेगाव, रिसोड, ताकतोडा, सेनगाव, वलाना, वनोजा फाटा, तसेच वाशिम जिल्ह्यातील मोहजा, वाशिम शहर, कळंबा महाली, बितोडा भोयर, मंगळूर पीर, दस्तापुर शिवनी, कारंजा, धानोरा, ताथोडा, वाढोना मार्गे अमरावतीमध्ये नांदगाव खंडेश्वर, सुलतानपूर, घुईखेड, चांदुर रेल्वे, देवगाव, भातकुळी मार्गे वर्धा जिल्ह्यात 29 नोव्हेंबर रोजी धोत्रा येथे सभा संपून गुरुवारी 30 नोव्हेंबर रोजी सेवाग्राम येथे मुक्काम होईल.
शुक्रवारी एक डिसेंबर रोजी वर्धा तालुक्यातील पवनार , घोरडता सेलू नंतर नागपूर जिल्ह्यातील हिंगणा, पेंढारी, एरणगाव, उमरी फाटा, हिंगणा तालुक्यातील नागपूर हिंगणा तालुका येथील येरणगाव, उमरी फाटा, चिंचोली पठार, पांजरा, तालुका काटोल बाजारगाव, पाच डिसेंबर मंगळवारी बाजारगाव, कळमेश्वर चौक, लीलाधर वानखेडे, सहा डिसेंबर रोजी नागपूर लीलाधर वानखेडे सभागृह मार्गे नागपूर शहरात संघर्ष यात्रा काढण्यात येणार असून गुरुवारी सात डिसेंबर रोजी रोजी नागपूर शहरात दिवसभर फेरी काढून संघर्ष यात्रेचा समारोप करण्यात येणार आहे.
या संघर्ष यात्रेतील सर्व मुक्कामाच्या ठिकाणी सभांचे आयोजन करण्यात आले आहे. पुणे ते नागपूर 800 किलोमीटरचे एकूण अंतर 45 दिवसात पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे अशी ही माहिती आ. रोहित पवार यांनी यावेळी दिली.
या संघर्ष यात्रेमध्ये क्रीडा विभागाचं सक्षमीकरण, होतकरू खेळाडूंना संधी, बेरोजगार युवकांच्या शैक्षणिक कर्जावरील व्याज माफी, नोकरदार महिला व विद्यार्थिनींसाठी वसतिगृहे,महिला सुरक्षेसाठी शक्ती कायदा, TRTI संस्थेसाठी स्वतंत्र आर्थिक तरतूद, सर्व भरती प्रकीया MPSC मार्फत करणे, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, अहमदनगर, नागपूर, कोल्हापूर, सोलापूर, अमरावती या Two Tier शहरांमध्ये IT क्षेत्राच्या विकासासाठी धोरण, सारथी, बार्टी, महाज्योती व TRTI संस्थाचे सक्षमीकरण, प्रयोगशील युवा शेतकऱ्यांसाठी विशेष योजना, असंघटीत क्षेत्रातील युवांसाठी Reskilling, Up skilling विद्यार्थ्यांसाठी जिल्हानिहाय अद्ययावत वसतिगृह शासनाने उभारावे याबाबत जनजागृती करण्यात येणार आहे. तसेच सर्व प्रकारची कंत्राटी नोकरभरती, अवाजवी परीक्षा शुल्क, पेपरफुटी विरोधात कायदा, शाळा दत्तक योजना, नोकर भरतीतील भ्रष्टाचार, शिक्षकांची रिक्त पदे, समुह शाळा योजना, रखडलेल्या नियुक्त्या, नोकर भरतीतील भ्रष्टाचार रोखणे, रखडलेली भरती प्रक्रिया, युवा आयोगाची स्थापना, महिलांची सायबर सुरक्षा, तालुका स्तरावर MIDC ची स्थापना या विषयांवर युवकांशी संवाद साधला जाणार आहे.
पुण्यातून सुरू होणाऱ्या संघर्ष यात्रेत पिंपरी चिंचवड शहरातून पहिल्या टप्प्यात अडीच हजार युवक सहभागी होणार असून टप्प्याटप्प्याने पिंपरी चिंचवड शहरातील युवकांची संख्या वाढविण्यात येईल अशी माहिती शहराध्यक्ष तुषार कामठे यांनी यावेळी दिली.