शबनम न्युज | मुंबई
पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने कर्णधारपदाचा राजीनामा दिला आहे. बाबर आझमने कसोटी, एकदिवसीय तसेच ट्वेन्टी२० प्रकारात कर्णधारपदाचा राजीनामा दिला आहे.
बाबरला वर्ल्डकप स्पर्धेत लौकिकाला साजेसा खेळ करता आला नाही. ९ सामन्यात बाबरने ४०च्या सरासरीने ३२० धावा केल्या. त्याच्या ८२.९०चा स्ट्राईक रेटवरही जोरदार टीका झाली होती. यामध्ये चार अर्धशतकांचा समावेश आहे. वर्ल्डकप स्पर्धेदरम्यान लग्नासाठी भारतात खरेदी केल्याप्रकरणीही बाबरवर टीका झाली होती. बाबरने ४३ वनडे, २० कसोटी आणि ७१ ट्वेन्टी२० सामन्यात पाकिस्तानचं नेतृत्व केलं आहे.
पाकिस्तान संघाला वर्ल्डकप स्पर्धेत बाद फेरी गाठता आली नव्हती. पाकिस्तान संघाला वर्ल्डकप स्पर्धेत ९ पैकी ४ सामन्यात विजय मिळवता आला तर ५ सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. पाकिस्तान संघाला भारत, ऑस्ट्रेलिया, अफगाणिस्तान, दक्षिण आफ्रिका, इंग्लंड यांच्याविरुद्ध पराभवाला सामोरं जावं लागलं होतं.
‘मी पाकिस्तानचा कर्णधार म्हणून राजीनामा देत आहे. हा निर्णय घेण्याची ही योग्य वेळ आहे असं मला वाटतं. तिन्ही प्रकारात कर्णधार म्हणून राजीनामा दिला असला तरी खेळाडू म्हणून तिन्ही प्रकारात मी उपलब्ध असेन. नव्या कर्णधाराला माझा नेहमीच पूर्ण पाठिंबा मिळेल. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे मी मनापासून आभार मानतो. त्यांनी माझ्या नेतृत्वगुणांवर विश्वास ठेवला’, असं बाबरने प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे.