शबनम न्युज | नागपूर
देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी गेल्या काही वर्षात 1 कोटी 25 लाखांपेक्षा अधिक युवकांना विविध योजनेतून कौशल्य प्रशिक्षण दिले आहे. ही गती आम्हाला आणखी वाढवायची आहे. आत्मनिर्भर भारताच्या प्रगतीसाठी कौशल्ययुक्त पीढीचीच आवश्यकता आहे, असे प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी येथे केले.
राजभवन येथे कौशल्य विकास विभागाद्वारे प्रकाशित ‘महापुरुषांचे कौशल्य विचार’ या पुस्तकाचे विमोचन व ‘स्वर्गीय दत्ताजी डिडोळकर शिक्षण सेवा सन्मान’ सोहळा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी राज्यपाल बोलत होते. कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा, अतिरिक्त मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, कौशल्य विद्यापिठाचे कुलगुरू डॅा.अपूर्वा पालकर, दत्ताजी डिडोळकर जन्मशताब्दी समारोह समितीचे सचिव डॅा.मुरलीधर चांदोरकर उपस्थित होते.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 350 व्या राज्याभिषेक वर्षानिमित्त ‘महापुरुषांचे कौशल्य विचार’ या पुस्तकाचे विमोचन औचित्यपूर्ण आहे. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा जोतिबा फुले, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, लोकमान्य टिळक, स्वातंत्र्यवीर सावरकर अशा महापुरुषांनी समाज, देशाच्या कल्याणाठी फार मोठे काम केले. या महापुरुषांचे कौशल्यविषयक कार्य व विचार विद्यार्थ्यांना पुस्तकातून समजेल, असे राज्यपाल म्हणाले.
छत्रपती शिवाजी महाराजांजवळ कुशल मनुष्यबळ नसतांना देखील त्यांनी आपले उत्तम सैन्य उभारले, किल्यांची बांधणी केली. मोगलांचा सामना केला व हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. महात्मा फुले व डॅा.बाबासाहेब आंबेडकर यांनी त्या काळात शिक्षणाला प्रोत्साहन दिले. वीर सावरकर आपल्या वैज्ञानिक विचारधारेने ओळखले जातात. या महापुरुषांनी आपल्या काळात अवलंबिलेले कौशल्यविषयक कार्य ‘महापुरुषांचे कौशल्य विचार’ या पुस्तकाच्या माध्यमातून पुढच्या पिढीपर्यंत जाणार आहे.
देशातील युवा पिढी कौशल्ययुक्त बनविण्यासाठी गेल्या काही वर्षात कौशल्य विकासावर भर देण्यात येत आहे. देशातील बेरोजगारी कमी करण्यासोबतच देशाच्या उत्पादकतेत वाढ, सर्वसामान्य नागरिकांचा जीवनस्तर उंचाविण्यासाठी विविध कौशल्ये अतिशय उपयुक्त ठरणार आहे. त्यामुळे येत्या काळात कौशल्य विकासासाठी आपल्याला गुंतवणुक करावी लागणार आहे, असे राज्यपाल म्हणाले.