शबनम न्युज
पुण्यात ‘विचारवेध’ संमेलनास प्रारंभ’
लोकशाहीच्या संरक्षणासाठी लोकांचा जाहीरनामा ‘ विषयावर चर्चा
Advertisement
पुणे :
‘जर्मनीत , युरोपात अपयशी ठरलेले हुकूमशाहीचे मॉडेल भारतावर लादण्याचा प्रयत्न होत आहे. वैचारिक, सांस्कृतिक युद्ध असून ते जिंकावे लागेल. राजकारण हे या युद्धातील अवजार आहे.ते टाळता येणार नाही. काही वेळा आपण असमर्थ ठरलो आहोत. आपण काही लढाया हरल्या तरी युद्ध जिंकू, यात शंका नाही. विचारवेध संमेलनासारखे प्रयत्न त्यासाठी महत्वाचे आहे’, असे प्रतिपादन ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते योगेंद्र यादव यांनी केले.
विचारवेध असोसिएशन, युवक क्रांती दल आणि महाराष्ट्र गांधी स्मारक निधी यांच्या वतीने आयोजित विचार वेध संमेलनास शनीवारी सकाळी गांधी भवन येथ प्रारंभ झाला. त्यावेळी उद्घाटन सत्रात योगेंद्र यादव बोलत होते. तुषार गांधी, डॉ.कुमार सप्तर्षी, आनंद करंदीकर, सुभाष लोमटे, श्रीरंजन आवटे , मुकुंद किर्दत , सुनीती सु.र., संदीप बर्वे,नीलम पंडित, सरिता आवाड , हरीश सदानी,गणेश विसपुते आदी मान्यवर उपस्थित होते.
दि.६ आणि ७ जानेवारी रोजी विचारवेध संमेलन – २०२४’ चे आयोजन करण्यात आले आहे. गांधी भवन, कोथरूड येथे हे संमेलन होत आहे.’ लोकशाहीच्या संरक्षणासाठी लोकांचा जाहीरनामा ‘ ही या संमेलनाची संकल्पना असून विविध आंदोलनातील कार्यकर्ते तसेच विचारवंत सहभागी झाले आहेत.
शनिवारी ६ जानेवारी रोजी सकाळी साडेदहा वाजता योगेंद्र यादव यांच्या ‘लोकतंत्र की रक्षा के सामने चुनौतीया’ भाषणाने संमेलनाचा प्रारंभ झाला.
योगेंद्र यादव म्हणाले,’ लोकशाहीत फक्त संख्या महत्वाची नाही, तर समुदाय महत्वाचा आहे.या वेळच्या निवडणुका हातातून गेल्या तर संविधान शिल्लक राहणार नाही. यावेळचे संकट आणीबाणी पेक्षा गंभीर आहे. संविधानातील मूलभूत विचारांवर सुनियोजित आणि अभूतपूर्व हल्ला आहे.
आत्ताच्या तथा कथित राष्ट्रवादाचा उगम न्यूनगंडातून आला आहे.शील, करुणा मानणाऱ्या भारताच्या स्वधर्मावर हल्ला झाला आहे.जर्मनीत , युरोपात अपयशी ठरलेले मॉडेल भारतावर लादण्याचा प्रयत्न होत आहे. आपण असमर्थ ठरलो आहोत. आपण काही लढाया हरल्या तरी युद्ध जिंकू, यात शंका नाही. वैचारिक, सांस्कृतिक युद्ध असून ते जिंकावे लागेल. राजकारण हे या युद्धातील अवजार आहे.ते टाळता येणार नाही. या पार्श्वभूमीवर विचार वेध संमेलनाचे आयोजन महत्वपूर्ण आहे. सत्तेत बसलेले लोकच प्रजासत्ताक तोडण्याचा प्रयत्न करीत आहेत.
आगामी ४ महिने फक्त निवडणुका जिंकण्याचे काम करावे लागेल. आपले भवितव्य पणाला लागले आहे. देश, संविधान वाचवले पाहिजे, असेही योगेंद्र यादव यांनी सांगीतले.
संस्कृती,राष्ट्रवाद, धर्म या गोष्टी संघ परिवाराच्या तावडीतून सोडवून खरा भारत घडवला पाहिजे. संविधानाला संसद, सर्वोच्च न्यायालय वाचविणार नाही, आपल्याला ते वाचवावे लागणार आहे, असेही त्यांनी सांगितले
*दोन दिवस विचार परामर्श,मुक्त संवाद,प्रश्नोत्तरे*
……………………..
यावर्षी लोकसभा निवडणूक होण्याची शक्यता असल्याने नागरिकांना पुरेशा माहितीवर आधारित, विचारपूर्वक आणि निर्भय मतदान करता येणे ,हे लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी आवश्यक आहे. लोकशाही रक्षणाच्या तातडीच्या प्रश्नावर विचार करण्यासाठी हे विचारवेध संमेलन आयोजित करण्यात आले आहे. योगेंद्र यादव, तुषार गांधी, डॉ. राम पुनियानी, डॉ.कुमार सप्तर्षी, निरंजन टकले, हरीष सदानी, सुनीती सु.र., अजित रानडे, संदीप बर्वे आणि अन्य मान्यवर दोन दिवस विविध सत्रात मार्गदर्शन करणार आहेत.
शनिवारी ६ जानेवारी रोजी सकाळी साडेदहा वाजता योगेंद्र यादव यांच्या ‘लोकतंत्र की रक्षा के सामने चुनौतीया’ भाषणाने संमेलनाचा प्रारंभ झाला. साडेअकरा वाजता ‘लोकशाही खच्चीकरणाचे जागतिक प्रयत्न’ या विषयावर अरविंद वैद्य यांचे व्याख्यान होईल. १२ वाजता सुनीती सु.र.यांचे ‘लोकशाही रक्षणासाठी लोकांचे धडे’ या विषयावर व्याख्यान होईल. पावणे दोन वाजता ‘माध्यमांचे स्वातंत्र्य आणि लोकशाही’ विषयावर अलका धुपकर संवाद साधतील. राही श्रुती गणेश या ‘शिक्षण संस्थांना फॅसिस्टांची मगरमिठी ‘ विषयावर माहिती देतील. साडे तीन वाजता ‘मुस्लिम मागासवर्गीय आणि लोकशाही रक्षण ‘या विषयावर तमन्ना इनामदार बोलणार आहेत. ४ वाजता प्रियदर्शी तेलंग हे ‘लोकशाहीसाठी दलित संघटन’ विषयावर व्याख्यान देतील. पावणे पाच वाजता वसुधा सरदार या ‘दारूममुक्तीसाठी चळवळ उभारणी’ या विषयावर तर प्रभात सिन्हा हे ‘माणदेशी चॅम्पियन्स’ विषयावर माहिती देतील. सव्वा सहा वाजता ‘हू किल्ड गांधी’ माहितीपट दाखविला जाईल आणि तुषार गांधी यांच्याशी चर्चा केली जाणार आहे.
रविवार, ७ जानेवारी या संमेलनाच्या दुसऱ्या दिवशी सव्वादहा वाजता समूहगीतांनी प्रारंभ होईल. साडेदहा वाजता ‘सद्भावना मिशन’ या विषयावर डॉ.राम पुनियानी मार्गदर्शन करतील. ‘लोकशाही रक्षण’ या विषयावर निरंजन टकले यांचे व्याख्यान होईल. १२ वाजता ‘स्त्रीवादाच्या संदर्भांत लैंगिक हक्क संरक्षण’ या विषयावर हरीश सदानी हे संवाद साधतील. पाऊण वाजता ‘संविधान प्रचार चळवळीचा अनुभव’ विषयाची माहिती संदीप बर्वे देतील. दुपारी सव्वा दोन वाजता ‘स्थानिक स्वराज्य संस्थातील महिला प्रतिनिधींचे सक्षमीकरण’ या विषयावर भीम रासकर माहिती देतील. पावणे तीन वाजता याच विषयवार नीती दिवाण हिंदीतून माहिती देतील. सायंकाळी ४ वाजता ‘लोकशाही बळकटीकरणासाठी सामाजिक सलोखा’ या विषयावर अजित रानडे यांचे व्याख्यान होईल. सव्वा पाच वाजता ‘लोकशाही रक्षणाच्या लढ्याची दिशा’ विषयावर डॉ.कुमार सप्तर्षी मार्गदर्शन करतील. सहा वाजता सरिता आवाड संमेलनाचा समारोप करतील.