शबनम न्युज | चिंचवड
कला, साहित्य, नाटक, संगीत या गोष्टी समृद्ध परंपरेचा वारसा सांगतात. हा वारसा जपताना आपल्या समाजाला समृद्ध करण्यासाठी प्रयत्न करणे शासनाचे कर्तव्य असून या कर्तव्यभावनेतून शासन नाट्य चळवळीच्या पाठीशी उभे राहील, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
मोरया गोसावी क्रीडा संकुल चिंचवड येथील आद्य नाटककार विष्णुदास भावे रंगमंचावर १०० व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या हस्तांतरण सोहळ्यामध्ये उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस बोलत होते. कार्यक्रमाला सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार, नाट्य संमेलनाध्यक्ष डॉ.जब्बार पटेल, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, नाट्य परिषदेच्या पिंपरी चिंचवड शाखेचे अध्यक्ष भाऊसाहेब भोईर आदी उपस्थित होते.
समृद्धीची खरी निशाणी साहित्य आणि कला आहे, असे सांगून श्री.फडणवीस म्हणाले, हौशी, प्रायोगिक, व्यावसायिक, लोककला अशा विविध नाट्य प्रकारांनी रसिकांचे मनोरंजन केले आहे. आपल्याकडील लोककला अत्यंत समृद्ध आहेत. लोककला समृद्ध करून त्यातून अर्थार्जन व्हावे, लोककलेचे संवर्धन व्हावे यासाठी योजना तयार करण्यात येईल. स्व.विक्रम गोखले यांनी २ एकर जागा वृद्ध कलावंतांसाठी दिली आहे. त्या ठिकाणी होणाऱ्या कामाचा आराखडा तयार करावा त्यासाठी सर्व सहकार्य शासनातर्फे करण्यात येईल.
१०० वे नाट्य संमेलन म्हणजे केशराने बहरलेले उद्यान
प्रेक्षकांच्या जो निकट असतो तो अभिनेता असतो असे नमूद करून उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस म्हणाले, समाजात संवेदनशीलता राहावी यासाठी नाट्य कलावंताचे कार्य महत्त्वाचे आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेकडे संवेदनशीलता नसल्याने कृत्रिम बुद्धिमत्ता कितीही विकसित झाली तरी कला, नाटक, गीत, संगीत यावर परिणाम होणार नाही. अण्णासाहेब किर्लोस्कार यांनी नाट्य संमेलनाला ‘केशराचं शेत’ ही उपमा दिली आहे आणि १०० वे नाट्य संमेलन म्हणजे ‘केशराने बहरलेले उद्यान’ आहे असे गौरवोद्गार त्यांनी काढले.
राज्याच्या अमृतकाळात रंगभूमीच्या वैभवासाठी मंथन व्हावे
फडणवीस म्हणाले, २०३५ साली महाराष्ट्राचा अमृतकाळ असेल. यावेळी आपले सांस्कृतिक क्षेत्र कुठे असेल याचा विचार करण्याची गरज आहे. या क्षेत्राच्या विकासाची कल्पना कलावंत करू शकतात, शासन त्यासाठी आवश्यक सहकार्य करेल. मराठी रंगभूमी आणि मराठी रंगकर्मी यांनी या देशातील रंगभूमी टिकविण्याचा प्रयत्न केला आहे. मराठी रंगभूमी सर्वोत्तम असल्याने ती टिकविणे, जगविणे आपली जबाबदारी आहे. मूकपट, बोलपट येऊनही नाटक संपले नाही. कारण मराठी नाटकांनी समृद्ध रसिक तयार केला आणि मराठी रसिक जिवंत असेपर्यंत नाटक संपू शकत नाही. आज जागतिक स्तरावर मराठी रसिक असल्याने जगात मराठी नाटक पोहोचेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.