९ जानेवारी रोजी जन्म झालेल्या मुलींच्या मातांना पोषण आहाराचे वाटप…
पिंपरी (दि. १२) :- भाजपा युवा मोर्चा सचिव तथा वीरांगना फाउंडेशनच्या अध्यक्षा तेजस्विनी कदम यांचा वाढदिवस विधायक उपक्रमाने साजरा करण्यात आला. पिंपरीतील यशवंतराव चव्हाण आणि जिजामाता रुग्णालयात ९ जानेवारी रोजी जन्म झालेल्या मुलींच्या मातांना पोषण आहाराचे वाटप करण्यात आले.
यावेळी शहर भाजपच्या शहराध्यक्षा सुजाता पलांडे, भाजपच्या प्राधिकरण मंडळ युवती संयोजिका नम्रता माळी, सारिका माळी, भावना पवार, श्रद्धा देशमुख आदींची उपस्थिती होती.
तेजस्विनी कदम म्हणाल्या, घरी बाळ जन्माला आले की घरातील प्रत्येक जण अगदी आनंदी असतो. परंतु, बाळाचे योग्य पोषण करण्यासाठी मातेच्या शरीरामध्ये पोषक घटकांचे प्रमाण मुबलक हवे. त्यामुळे मातेने पौष्टिक तेच खाल्ले पाहिजे. प्रसूतीनंतर महिलांचे शरीर पूर्वीसारखे राहत नाही. ते पूर्वीसारखे बनवायला वेळ लागतो. मुलाला जन्म दिल्यानंतर आईचे शरीर खूपच कमजोर होते. साहजिकच तिच्या शरीरात कुठल्याही प्रकारची शक्ती किंवा प्रतिकारशक्ती उरलेली नसते. या काळात काळजी घेतली गेली नाही तर तिला निरनिराळे आजार होऊ शकतात. अशा परिस्थितीत स्त्रीला पोषक तत्वांनी युक्त आहार आवश्यक असतो. या दरम्यान स्त्रीने आपल्या आहारात संपूर्ण धान्य, भाज्या आणि फळे तसेच प्रथिनेयुक्त पदार्थांचा समावेश करावा. संतुलित आहार घ्यावा. गर्भारावस्थेत मातेची काळजी घेणे आवश्यक आहे, तेवढेच बाळंतपणानंतरही काळजी घेणे आवश्यक ठरते. मुली जगवा या भावनेतून जमेल तसे कार्य करीत आहे. सध्या समाजात मुलींची उणीव भासत आहे, असे मत व्यक्त केले.