शबनम न्युज | पुणे
राज्यात प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांसाठी पुढील वर्षापासून शालेय क्रीडा स्पर्धा आयोजित करण्याबाबत क्रीडा विभागाशी चर्चा करुन निर्णय घेण्यात येईल, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी केले.
हरिभाऊ गजानन देशपांडे इंग्रजी माध्यम शाळा येथे आयोजित महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी क्रीडावर्धनी क्रीडा करंडक २०२३-२४ पारितोषिक वितरण समारंभप्रसंगी ते बोलत होते. पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक संभाजी होळकर, बारामती सहकारी बँकचे अध्यक्ष सचिन सातव, महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष बाबासाहेब शिंदे, उपाध्यक्षा आनंदी पाटील, क्रीडावर्धनीचे अध्यक्ष विजय भालेराव, सचिव डॉ. अतुल कुलकर्णी, नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष जय पाटील आदी यावेळी उपस्थित होते.
पवार म्हणाले, खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी राज्य शासनाकडून विविध योजनांची अंमलबजावणी करण्यात येत आहे. देशाच्या लोकसंख्येच्या तुलनेत पदके जिंकण्याचे प्रमाण कमी आहे. शालेय जीवनाच विद्यार्थ्यांना क्रीडा विषयक मार्गदर्शन केल्यास ते विविध राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत पदके जिंकून देतील. राज्यातील अधिकाधिक खेळाडूंना क्रीडा स्पर्धेत भाग घेता यावा यासाठी तालुका, जिल्हा आणि विभाग स्तरावर क्रीडा संकुलात पायाभूत सुविधा भक्कम करण्यावर भर देण्यात येत आहे. त्यांचे मनोबल उंचवावे यासाठी पुरस्काराच्या रक्कमेत वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असे उपमुख्यमंत्री पवार म्हणाले.
विद्यार्थ्यांचा अंगी असलेल्या क्रीडागुणांचा उपयोग करुन घ्यावा
महाराष्ट्राची क्रीडा क्षेत्रातही चांगली परंपरा आहे. स्व. खाशाबा जाधव यांचा वारसा पुढे चालविण्यासाठी कठोर मेहनत घ्यावी लागेल, यासाठी शासनाच्यावतीने आवश्यक ती मदत केली जाईल, अशी ग्वाही पवार यांनी दिली.
शालेय स्पर्धा आयोजित करतांना विद्यार्थ्यांच्या वयाचा विचार करता निवास, जेवण, स्वच्छतागृह अशा गोष्टीकडे बारकाईने लक्ष देण्याची गरज आहे. प्रत्येकाच्या अंगी क्रीडा कौशल्य असते, त्याचा उपयोग करुन घ्यावा. स्पर्धा निकोप पद्धतीने झाल्या पाहिजेत, खेळाडूवृत्तीने खेळल्या गेल्या पाहिजे. यशानी हरळून तसेच अपयशाने खचून जाऊ नये, असा संदेश त्यांनी खेळाडूंना दिला.