व्यावसायिक, स्टार्टअप व गुंतवणूकदारांचे प्रतिपादन; ‘एआयसी पिनॅकल’तर्फे इन्व्हेस्टमेंट कॉन्क्लेव्ह व स्टार्टअप एक्स्पो
पुणे : तरुणाईच्या नवकल्पनांना वास्तवाचे व्यासपीठ देणे, संकल्पनांना व्यवसायाभिमुख करणे आणि उद्योजकीय मानसिकता घडवणे, गरजेचे आहे. त्यातून देशाच्या प्रगतीमध्ये वाढ, तसेच रोजगारनिर्मिती होणार आहे, असे प्रतिपादन व्यावसायिक, स्टार्टअप व गुंतवणूकदार तज्ज्ञांनी केले.
Advertisement
एआयसी पिनकल आंत्रप्रेन्युअरशिप फोरमतर्फे सेनापती बापट रस्त्यावरील एमसीसीआयएच्या सुमंत मुळगावकर सभागृहात झालेल्या इन्व्हेस्टमेंट कान्क्लेव्ह आणि स्टार्टअप एक्स्पो २०२४च्या उद्घाटन कार्यक्रमात विविध क्षेत्रातील नामवंत व्यावसायिक, गुंतवणूकतज्ञ आणि मार्गदर्शकांनी उपस्थितांशी संवाद साधला. २० पेक्षा अधिक गुंतवणूकदार सहभागी झाले. ३६ स्टार्टअप्सने भांडवल मिळण्यासाठी सादरीकरण केले. ३० स्टार्टअप्सने एक्स्पोमध्ये सहभाग घेतला.
यावेळी पिनॅकल इंडस्ट्रीजचे अध्यक्ष डॉ. सुधीर मेहता, लेफ्टनंट जनरल राजेंद्र निंभोरकर (निवृत्त), एआरआयच्या माजी संचालक रश्मी ऊर्ध्वरेषे, विश्वकर्मा विद्यापीठाचे अध्यक्ष भरत अग्रवाल, जीतो पुणेचे अध्यक्ष राजेश सांकला, स्टेट एक्सपोर्ट अप्रायजल कमिटीचे माजी अध्यक्ष दीपक म्हैसेकर, जीतोचे उपाध्यक्ष जीनेंद्र भंडारी, अर्थयानचे संस्थापक अनिरुद्ध जोग आदी मान्यवर उपस्थित होते.
डॉ. सुधीर मेहता म्हणाले, “झपाट्याने विकसित होत असलेल्या भारतात तरुणाईसाठी विविध क्षेत्रांत असंख्य संधी निर्माण होत आहेत. या पार्श्वभूमीवर तरुणाईच्या नवकल्पना समजून घेऊन, त्यांना व्यावसायिक व्यासपीठ निर्माण करण्यास सर्वतोपरी साह्य करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम आयोजिला. एकट्याने प्रयत्न करण्यापेक्षा समविचारी तरुणाईने एकत्रित प्रयत्न केल्यास, मूळ कल्पना अधिक उत्तम पद्धतीने साकारण्यास मदत होईल, हा हेतू आहे. स्टार्टअप एक्स्पोच्या निमित्ताने असे अनेक कल्पक तरुण एकमेकांना भेटावेत, त्यांच्यात सकारात्मक देवाणघेवाण व्हावी आणि एकत्रित स्वरुपात त्यांच्या नवकल्पनांनी व्यवसायाचे रूप धारण करावे, हे अपेक्षित आहे.”
भरत आग्रवाल यांनी विद्यापीठीय प्रयोगशाळांतून विद्यार्थ्यांच्या कल्पकतेने व्यावसायिक संधींचे विस्तृत आकाश पाहावे, यासाठी जीतो सोबत सामंजस्य करार केल्याचा उल्लेख केला. नवकल्पनांकडून त्या कल्पनांचे व्यावसायिक रूप साकार होण्यासाठी हा करार साह्यभूत ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
जीनेंद्र भंडारी यांनी स्टार्टअप एक्स्पोच्या माध्यमातून स्थानिक स्टार्टअप पुढे यावेत, यासाठी जीतोच्या माध्यमातून सातत्याने जाणीवजागृती, कार्यशाळा, शिबिरे आयोजित केली जात असल्याची माहिती दिली. नवकल्पकतेला वास्तवात आणणे, हा आमचा उद्देश असल्याचे ते म्हणाले.
उद्योजकीय मानसिकता घडवण्यासाठी तसेच व्यवसायांचे प्रमाण वाढवण्याच्या मार्गात आजही आव्हाने उभी आहेत, मात्र उद्योजक आणि तरुणाईचे प्रतिनिधी एकत्र आल्यास या आव्हानांवर मार्ग शोधणे शक्य होईल, असा विश्वास दीपक म्हैसेकर यांनी व्यक्त केला.
आटोमोटिव्ह क्षेत्रासमोरही अनेक आव्हाने आहेत. वाहतूक सुरक्षा हे त्यातील सर्वांत मोठे आव्हान आहे, तरुणाईने या आव्हानांचे स्वरूप समजून घेत मार्ग काढण्याचा प्रयत्न करण्याचे आवाहन डॉ. रश्मी उर्ध्वरेषे यांनी केले.
राजेंद्र निंभोरकर यांनीही मनोगत मांडले. एक्स्पोचे उद्घाटन झाल्यानंतर स्टार्टअपचे सादरीकरण तसेच टॉक शो आयोजित करण्यात आला होता. ‘एआयसी पिनॅकल’चे मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील धाडीवाल यांनी स्वागत प्रास्ताविक केले. श्रद्धा सप्तर्षी यांनी सूत्रसंचालन केले.