शबनम न्युज | रायगड (वृत्तसंस्था)
शरद पवार गटाला निवडणूक आयोगाने नवे चिन्ह दिले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार या पक्षाला नुकतेच केंद्रीय निवडणूक आयोगाने तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह दिले आहे. पक्षाच्या या नवीन चिन्हाचे अनावरण शरद पवार गटांनी रायगड किल्ल्यावर केले. यावेळी शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे ,नेते जयंत पाटील ,सर्व ज्येष्ठ नेते आणि पदाधिकारी यांच्या उपस्थितीत चिन्हाचे अनावरण शरद पवार यांच्या हस्ते करण्यात आले.
तब्बल 40 वर्षानंतर पक्षाच्या अनावरण चिन्हासाठी शरद पवार हे रायगड किल्ल्यावर आले. याआधी रोप-वे आणि मग पालखीतून शरद पवारांना किल्ल्यावर नेण्यात आल त्या ठिकाणी पोवाडा आणि सांस्कृतिक कार्यक्रमासह पक्षाचे नाव, चिन्हांचे अनावरण करण्यात आले.
यावेळी बोलताना शरद पवार म्हणाले, सध्याचा संघर्ष हा वैचारिक संघर्ष आहे. या देशात अनेक राजे झाले, संस्थानिक झाले. परंतु रयतेचा राजा एकच झाला. सध्या राज्यात अडचणी वाढतील, अशी स्थिती आहे. शिवछत्रपतींचे राज्य सामान्यांची सेवा करणारे राज्य होते. आज महाराष्ट्राची स्थिती बदलायची असेल तर पुन्हा एकदा या ठिकाणी जनतेचे राज्य येईल, यासाठी प्रयत्न करायचे आहेत. निवडणूक आयोगाने रणशिंग फुकायला तुतारी दिली आहे. संघर्षातून प्रेरणा देणारी ही तुतारी आहे. तुमच्या संघर्षातून त्यागातून यश मिळविणार याची खात्री आहे, या ऐतिहासिक भूमीत आपण आलोय, या ठिकाणी प्रेरणा घेऊन जनतेची सेवा करूया, असे शरद पवार यांनी म्हटलं आहे.