शबनम न्यूज , प्रतिनिधी :
भाजपने लोकसभा उमेदवारांची पहिली यादी नुकतीच जाहीर केली. त्यात महाराष्ट्रातील एकाही जागेचा समावेश नव्हता. यामागे जागावाटपाचा तिढा असल्याचे बोलले जात आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा मंगळवारी रात्री १०च्या सुमारास मुंबईत दाखल झाले. त्यानंतर ‘सह्याद्री’ अतिथीगृहावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबरोबर त्यांची बैठक झाली. रात्री उशिरापर्यंत चाललेल्या बैठकीनंतर महायुतीतील जागावाटपाचा तिढा सुटण्याची शक्यता आहे.
छत्रपती संभाजीनगरातील सभा संपल्यानंतर शहा यांनी मुंबईकडे प्रयाण केले. तत्पुर्वी शिंदे, फडणवीस आणि पवार यांच्यामध्ये जागावाटपाबाबत प्राथमिक चर्चा झाली आहे. शिवसेनेला २० ते २२ तर राष्ट्रवादीला किमान १० जागांची अपेक्षा आहे. विद्यामान खासदार असलेल्या जागा त्याच पक्षांकडे राहतील, असे सर्वसाधारण सूत्र ठरलेले आहे. मात्र उद्धव ठाकरे, शरद पवार गट आणि काँग्रेसकडे असलेल्या जागा भाजप, शिंदे किंवा अजित पवार गट यापैकी कोणी लढवायच्या, यावरून वाद आहे.