शबनम न्युज | मुंबई
“मोदी सरकारने ईडी आणि सीबीआयला देशभरातल्या विरोधी पक्षांमधील नेत्यांच्या मागे लावलं आहे. त्यापाठोपाठ आता त्यांनी थेट वेगवेगळ्या राज्यांच्या प्रमुखांना अटक करण्याचं सत्र सुरू केलंय असं दिसतंय,” असे म्हणत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी भाजप सरकारवर निशाणा साधला आहे. आज शरद पवारांनी पत्रकार परिषद घेऊन अरविंद केजरीवाल यांना पाठिंबा दर्शवित भाजपवर टीका केली आहे.
दिल्ली सरकारच्या कथित मद्य धोरण घोटाळ्याप्रकरणी ईडीने (अंमलबजावणी संचालनालय) दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पार्टीचे अध्यक्ष अरविंद केजरीवाल यांना अटक केली आहे. या अटकेनंतर इंडिया आघाडीतले आम आदमी पार्टीचे सर्व मित्र पक्ष केजरीवाल यांच्या पाठिशी उभे राहिले आहेत. इंडिया आघाडीमधील सदस्य असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षदेखील केजरीवाल यांच्या पाठिशी उभा राहिला आहे. राष्ट्रवादीने केजरीवाल यांना झालेल्या अटकेचा निषेध नोंदवला आहे.
शरद पवार म्हणाले, मोदी सरकारने ईडी आणि सीबीआयला देशभरातल्या विरोधी पक्षांमधील नेत्यांच्या मागे लावलं आहे. त्यापाठोपाठ आता त्यांनी थेट वेगवेगळ्या राज्यांच्या प्रमुखांना अटक करण्याचं सत्र सुरू केलंय असं दिसतंय. त्यांनी आधी झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना तुरुंगात डांबलं. त्यापाठोपाठ आता दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक केली आहे. दिल्ली सरकारच्या मद्य धोरणावरून ही अटक करण्यात आली आहे. राज्य सरकारचं एक धोरण ठरवलं म्हणून अशा प्रकारे अटक करणं चुकीचं आहे.
पुढे बोलताना ते म्हणाले, अरविंद केजरीवाल हे पंतप्रधान मोदींच्या भूमिकेला दिल्लीत बसून विरोध करण्याची हिंमत दाखवतात. हेच भाजपाला सहन होत नाही. परंतु, आता इंडिया आघाडीने भूमिका घेतली आहे की, आपण केजरीवाल यांच्या पाठिशी उभं राहायचं. तमिळनाडू आणि झारखंडमध्ये जे झालं तेच आता दिल्लीत होतंय. उद्या हे देशभरात इतर ठिकाणी देखील होईल. भाजपाने देशभरात दहशतीचं वातावरण निर्माण केलं आहे. सत्ता आपल्या हातात ठेवण्यासाठी भाजपाचा हा सगळा खटाटोप चालू आहे.