शबनम न्यूज : पुणे (दि.०२ जानेवारी ) :- अस्पृश्यतेविरोधातील एल्गार आणि अस्मितेचा हुंकार असे भीमा-कोरेगावच्या लढ्याचे ऐतिहासिक महत्त्व आहे. शूरवीर ‘महार रेजिमेंट’ने आपल्यापेक्षा संख्येने ४० पट अधिक असणाऱ्या पेशव्यांच्या फौजेचा पराभव करीत इतिहास लिहला. ‘महार रेजिमेंट’ने पेशवाईच्या सैन्याचा धुव्वा उडवत १ जानेवारी १८१८ रोजी अवघ्या १६ तासांमध्ये भीमा-कोरेगावच्या लढाईत पेशव्यांच्या सैन्याचा पराभव केला. पंरतु,आज शासन समाज बनण्यासाठीच्या प्रक्रियेची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या महाराष्ट्रातील आंबेडकरी समाजाचा लढवय्या बाणा बोथट झाला आहे. राज्यात बहुजनांचे शासन नाही. आता शासनकर्ती जमात बनने हीच भीमा कोरेगाव लढाईतील शहीद शूरविरांना खरी श्रद्धांजली ठरेल, अशी प्रतिक्रिया बसपाचे प्रदेशाध्यक्ष अँड.संदीप ताजने यांनी भीमा कोरेगाव शौर्य दिनानिमित्त विजयस्तंभाला अभिवादन केल्यानंतर व्यक्त केली.
शासन समाज बनण्याचा संदेश अप्रत्यक्षरित्या या शूरवीर महार सैनिकांनी दिला. जर महाराष्ट्रात शिवसेना, कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि भाजपला धडा शिकवायचा असेल, तर आंबेडकरी समाजाने एक निळ्या झेंड्याखाली, हत्ती या निवडणूक चिन्हाखाली एकत्रित येत स्वत:चे सरकार बनवले पाहिजे. शासनकर्ती जमात होणे, हेच या शूरवीरांना खरे अभिवादन ठरेल असे मत अँड.ताजने यांनी व्यक्त केले.
अवघ्या ५०० महार रेजिमेटने पेशवाईचा पर्यायाने त्यांच्या अस्मितेला नाकारणाऱ्या विचारसरणीचा पराभव केला. ही ऐतिहासिक घटना जागतिक पातळीवर आपला विशेष असा ठसा टिकवून आहे. महारांचा गौरवशाली इतिहास देशात असलेल्या लोकशाहीचा महत्वाचा पाया आहे, असे प्रतीपादन प्रदेश प्रभारी प्रमोद रैना यांनी केले. बसपा कार्यकर्त्यांनी या लढाईचा आदर्श घेत राज्यात आता बहुजनांचे सरकार आणण्याच्या कार्याला लागले पाहिजे, असे रैना म्हणाले.
भीमा-कोरेगाव शौर्य दिनानिमित्त विजयस्तंभाला बसपाचे राज्यातील प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी उपस्थित राहून मानवंदना दिली. प्रदेश महासचिव सुदीप गायकवाड साहेब, प्रदेश सचिव भाऊ शिंदे, अविनाश वानखडे, नागसेन माला, पुणे जिल्हा अध्यक्ष हुलगेश भाई चलवादी, पुणे प्रभारी रमेश अप्पा गायकवाड, जिल्हा महासचिव सागर खंडे, सनी तेलंग तसेच प्रमुख कार्यकर्ते यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते.