शबनम न्युज | पुणे
“कृत्रिम बुद्धिमत्ता, मशीन लर्निंग, इंटरनेट ऑफ थिंग्ज, ऑटोमेशन, ५-जी तंत्रज्ञान यांसारख्या नवतंत्रज्ञानाचा अंतर्भाव होत असल्याने अभियांत्रिकी क्षेत्रात मोठ्या प्रमाणात करिअरच्या संधी आहेत. ‘इंडस्ट्री ४.०’चे अवलंबित्व इंटरनेटवर असल्याने औद्योगिक क्षेत्रात अनेक पर्याय, संधी निर्माण होत आहेत. आवश्यक कौशल्ये आत्मसात केल्यास या नव्या युगात तुम्ही स्वतःला चांगल्या पद्धतीने घडवू शकाल,” असा कानमंत्र तज्ज्ञांनी विद्यार्थी-पालकांना दिला.
वाघोली येथील जीएच रायसोनी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंटच्या वतीने आयोजित ‘जीएचआर करिअर कनेक्ट २०२२’मध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ इनोव्हेशन सेंटरचे प्रमुख प्रा. डॉ. अरविंद शाळीग्राम, टेक महिंद्राचे ऑटोमेशन प्रमुख तुषार सांख्ये, प्रेरक वक्त्या अपराजिता भूषण, करिअर समुपदेशक केदार टाकळकर, रायसोनी कॉलेजचे कॅम्पस संचालक डॉ. आर. डी. खराडकर यांनी मार्गदर्शन केले.
‘स्वप्न तुमचे, मार्गदर्शन आमचे’ या संकल्पनेवर पुणे कॅम्पमधील जवाहरलाल नेहरू मेमोरियलमध्ये झालेल्या या कार्यक्रमाला बारावी विज्ञान शाखेतील उत्तीर्ण विद्यार्थी व त्यांच्या पालकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली. यावेळी ग्लोबल एज्युकेशनचे संचालक आदित्य भंडारी, रायसोनी कॉलेजचे उपसंचालक डॉ. वैभव हेंद्रे, उपसंचालक डॉ. नागनाथ हुले आदी उपस्थित होते.
डॉ. अरविंद शाळीग्राम म्हणाले, “अभियांत्रिकी हा रोजगाराभिमुख अभ्यासक्रम आहे. गेल्या काही वर्षात झालेल्या डिजिटल क्रांतीमुळे विविध सेवा सहज उपलब्ध होत आहेत. मोबाईल, इंटरनेटमुळे आपण एकमेकांशी जोडले गेलो आहोत. चॅटबॉट्स आपले जीवन अधिक सुसह्य करत आहेत. तंत्रज्ञान आले, तरी आपल्याला खुला विचार, तांत्रिक कौशल्य आत्मसात करून समाजाच्या, देशाच्या पुढील समस्यांना उपयोगी उपाय देण्याचे काम आपण करावे.”
अपराजिता भूषण म्हणाल्या, “इतरांशी तुलना करण्याऐवजी आपल्यातील कलागुण ओळखून त्यात करिअर घडवावे. कमतरता प्रत्येकात असतात, मात्र, त्यात सुधारणा कशी करता येईल, याचा विचार केला पाहिजे. आपली आवड, ध्येय, भविष्यातील संधी ओळखून त्याच्या पूर्तीसाठी मेहनत घ्यावी. क्रियाशील, समर्पित वृत्ती जोपासावी. वेगळ्या पद्धतीने विचार, भाषा व संवाद कौशल्य आत्मसात करावे. नेतृत्व, निर्णय क्षमता यासह मूल्यांची, चारित्र्याची जपणूक करावी.”
तुषार सांख्ये म्हणाले, “तंत्रज्ञानामुळे अभियांत्रिकी सातत्याने विकसित होत आहे. संधीची नवनवीन दालने खुली होत आहे. रोजगाराच्या अनेक संधी असूनही कौशल्यांचा अभावाने बेरोजगारीची समस्या आहे. त्यामुळे आधुनिक तंत्रज्ञान, कौशल्ये आत्मसात करावीत.” केदार टाकळकर यांनी अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रिया अतिशय सोप्या पद्धतीने समजावून सांगितली.
डॉ. आर. डी. खराडकर यांनीही अभियांत्रिकीतील करिअर, रायसोनी कॉलेजमधील उपलब्ध अभ्यासक्रम याविषयी सांगितले. ऋता करंदीकर यांनी सूत्रसंचालन केले. वंदना दुरेजा यांनी आभार मानले. यावेळी उल्लेखनीय यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात आले.