शबनम न्यूज | पिंपरी चिंचवड
“भारताची एकात्मता बलशाली करू आणि देशाचे संरक्षण करणा-यांप्रती सन्मान बाळगू, भारतास २०४७ पर्यंत आत्मनिर्भर आणि विकसित राष्ट्र बनवण्याचे स्वप्न साकार करू, गुलामीची मानसिकता मुळापासून नष्ट करू, देशाच्या समृद्ध वारसाचा गौरव करू तसेच देशाचे नागरिक म्हणून आम्ही सर्व कर्तव्यांचे पालन करू ” अशी सामुहिक पंचप्रण शपथ पन्नास हजाराहून अधिक शिवप्रेमी, देशप्रेमी आणि नागरिकांनी अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत घेतली.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक सोहळ्यास ३५० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल त्यांना १ हजार ढोल ताशांद्वारे मानवंदना देण्याचा भव्य कार्यक्रम भक्ती शक्ती समूहशिल्प परिसरात पिंपरी चिंचवड शिवजयंती समिती, पिंपरी-चिंचवड ढोल ताशा महासंघ यांच्या सहकार्यातून आयोजित करण्यात आलेला होता,
तर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने “माझी माती माझा देश” अभियान शहरात राबविण्यात येत आहे, त्या अनुषंगाने आयुक्त शेखर सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली निगडी येथील भक्ती शक्ती समूहशिल्प परिसरात मातीला नमन आणि वीरांना वंदन करण्यासाठी काल भव्य सामुहिक पंचप्राण शपथेचे तसेच अमृत कलश यात्रा उपक्रमाचे आयोजनही करण्यात आले होते, या संयुक्त कार्यक्रमात सर्वांनी सामुहिक पंचप्रण शपथ घेतली.
या शपथेच्या वेळी आमदार छत्रपती शिवेंद्रराजे भोसले,उमा खापरे, महेश लांडगे, अश्विनी जगताप,पद्मश्री गिरीश प्रभुणे, माजी महापौर संजोग वाघेरे, माजी नगरसदस्य शंकर जगताप,अजित गव्हाणे, राहूल कलाटे,सचिन चिखले,नामदेव ढाके,विठ्ठल काटे, शत्रुघ्न काटे,राजू मिसाळ, अमित गावडे, शितल शिंदे, प्रसाद शेट्टी,मारूती भापकर,उत्तम केंदळे, राजेश पिल्ले,माजी नगरसदस्या सुमन पवळे, सुजाता पालांडे, शर्मिला बाबर,लोकशाहीर अण्णा भाऊ साठे आर्थिक विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष अमित गोरखे, पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष सदाशिव खाडे, संयुक्त कार्यक्रमाचे समन्वयक संदीप जाधव,विनोद बंसल, महाराष्ट्र ढोल ताशा महासंघाचे अध्यक्ष पराग ठाकूर, शिवजयंती समितीचे समन्वयक कुणाल साठे,पिंपरी चिंचवड ढोल ताशा महासंघाचे अध्यक्ष विशाल मानकर, पिंपरी चिंचवड महापालिकेचे उप आयुक्त मिनीनाथ दंडवते, विशेष अधिकारी किरण गायकवाड, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी ओमप्रकाश बहिवाल, विविध सामाजिक संघटनेचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.
“माझी माती माझा देश” अंतर्गत घराघरातून माती व तांदूळ गोळा करून अमृत कलश दिल्लीला पाठविण्याच्या कार्यक्रमाचा शुभारंभ काल हजारो ढोलताशांच्या गजरात भारत मातेचा जयजयकार करत अमृत कलशच्या पुजनाने करण्यात आला,विविध भागातून आणलेली माती या कलशामध्ये ठेवण्यात आली आहे.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या समारोपीय कार्यक्रमांतर्गत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून “मेरी माटी मेरा देश” अर्थात “माझी माती माझा देश” उपक्रम देशभर राबवला जात आहे, पिंपरी चिंचवड शहरातील या उपक्रमाची सुरुवात नऊ ऑगस्ट क्रांतीदिनापासून आयुक्त शेखर सिंह यांच्या हस्ते चिंचवड येथे क्रांतीवीर चापेकर चौक येथील चापेकर बंधूच्या समूहशिल्पास पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. त्यानंतर अनेक ठिकाणी विविध कार्यक्रमांचे १३ ते १८ ऑगस्ट पर्यंत आयोजन महापालिकेच्या वतीने करण्यात आले होते.
१३ ऑगस्ट रोजी “सैनिकहो तुमच्यासाठी ” या सन्मान कार्यक्रमात निगडी येथील ग.दि.माडगूळकर नाट्यगृह येथे स्वातंत्र्य सैनिक आणि स्वातंत्र्य सैनिकांचे कुटुंबीय त्याचप्रमाणे शहीद जवानांचे कुटुंबीय आणि माजी सैनिकांचा सत्कार करण्यात आला,तसेच शेकडो क्रांतिकारकांच्या फोटोंचे माहितीसह भव्य प्रदर्शन आणि देशभक्तीपर गीतांचे आयोजन त्या ठिकाणी करण्यात आले होते.
१४ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्षपूर्तीनिमित्त निगडी येथील दुर्गादेवी टेकडी, पिंपळे सौदागर येथील लिनीअर गार्डन आणि भोसरी येथील साईनाथ हॉस्पिटल मागील उद्यान या सर्व ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते ७५ देशी रोपांचे वृक्षारोपण करण्यात आले.
स्वातंत्र्य दिन निमित्त १५ ऑगस्ट रोजी हेरिटेज वाॅकचे आयोजन चिंचवड येथील एल्प्रो माॅल येथे करण्यात आले होते या कार्यक्रमास माजी सैनिक, ज्येष्ठ नागरिक तसेच अनेक सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्ते उपस्थित होते. स्वातंत्र्यदिनानिमित्त विविध गृहनिर्माण संस्था, भाजी मंडई, शॉपिंग कॉम्प्लेक्स येथे पंचप्राण शपथ घेण्यात आली तसेच भक्ती शक्ती चौक निगडी येथे देशभक्तीपर गीतांचा भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. त्याच ठिकाणी अच्युत पालव यांनी “माझी माती माझा देश” या विषयावर कॅलिग्राफी सादर केली.
१८ ऑगस्ट रोजी औद्योगिक नगरीतील खाजगी औद्योगिक संस्थांमध्ये पंचप्रण शपथ घेण्यात आली.
तसेच सर्व प्रभागांमध्ये अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभातफेरी, जनजागृती कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.
महानगरपालिकेच्या वतीने घेण्यात येत असलेल्या माझी माती, माझा देश कार्यक्रमांमध्ये तसेच महापालिकेच्या इतरही कार्यक्रमांमध्ये शहरातील नागरिक उत्स्फुर्तपणे सहभागी होत असल्याबद्दल आयुक्त शेखर सिंह यांनी शहरवासियांचे आभार व्यक्त केले आहेत.