शबनम न्युज | मुंबई (वृत्तसंस्था)
‘समृद्धी महामार्ग घाईघाईने बनवून श्रेय घेण्याचा प्रयत्न केला गेला, त्याचाच परिणाम जनता भोगत आहे,’ अशी टीका खासदार संजय राऊत यांनी भाजपावर केली आहे. समृद्धी महामार्गासाठी शेतकऱ्यांच्या जमिनी ओरबाडून घेतल्या, त्या रस्त्यावरील अनेक लहान लहान उद्योग फळबागा उध्वस्त करण्यात आल्या, त्याचे हे श्राप आहे. सबुरीने घेता आले असते, परंतु जी रितीने हा महामार्ग घाईघाईने बनवून घेतला त्याचाच हा परिणाम आहे.
समृद्धी महामार्गावर वैजापूरजवळ टेम्पोचा अपघात झाला. टोल नाक्यावर टेम्पोने ट्रकला धडक दिल्यामुळे 12 जणांचा मृत्यू झाला तर 15 जण जखमी झाले आहेत. आतापर्यंत समृद्ध महामार्गावर अनेक अपघात घडले आहेत, काल झालेल्या अपघातामुळे खासदार संजय राऊत यांनी भाजपावर निशाणा साधला आहे.
ते म्हणाले, आतापर्यंत गेल्या वर्षभरात इतके भीषण अपघात या रस्त्यावर झालेले आहेत. या अपघातांची जबाबदारी कोणीही घ्यायला तयार नाही. महाराष्ट्रातले मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे रस्ता आम्ही बनवला म्हणून श्रेय घ्यायला पुढे होते. आम्ही केला सांगत होते, मग त्या रस्त्यावर जे रक्त सांडतंय, बळी जात आहेत, त्याची ही जबाबदारी तुम्हाला घ्यावी लागेल. अजूनही त्या महामार्गावर काही सुधारणा करून जर लोकांचे प्राण वाचवता आले, तर पहावे इतका रखरखीत महामार्ग या जगात कुठे दिसला नाही. कुठे थांबा नाही, लोकांच्या विश्रांतीची जागा नाही ,काहीच नाही, असा आरोप त्यांनी यावेळी केला आहे.