शबनम न्यूज | मुंबई
मराठ्यांना आरक्षण असताना ही पुरावे लपवून ठेवण्यात आले. समित्यांनी पुरावे शोधण्याचे काम केले, पण सरकारकडे अहवाल आल्यावर पुरावे नसल्याचे सांगितले जायचे. मग आता कसे काय पुरावे आढळत आहेत? याचे उत्तर सरकारने द्यावे, असे आव्हान मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी दिले आहे. सत्तर वर्ष आमचे वाटोळे कोणी केले? असा सवाल ही जरांगे पाटील यांनी उपस्थित केला आहे. जरांगे पाटील यांची सातारा येथे सभा पार पडली. तेव्हा संवाद साधताना ते बोलत होते.
मनोज जरंगे पाटील म्हणाले, ज्यांनी आरक्षण समजून घेतलं त्यांचे पिढ्या सुधारल्या. मराठ्यांना 70 वर्षापासून आरक्षण होतं. पण जाणून-बुजून षडयंत्र रचण्यात आलं. 70 ते 75 वर्षापासून सत्ताधारी मंडळींवर ओबीसी नेत्याचा प्रचंड दबाव होता. मराठ्यांना आरक्षण असूनही लाभ दिला नाही. आमचा आरक्षण खाताना काही वाटलं नाही का? आरक्षणासाठी आमच्या तरुणांचे मुडदे पडत आहेत.
70 वर्ष आमचं झालेलं नुकसान सरकार कसे भरून काढणार आहे. आमच्या जागा कोणी बळकावल्या. 24 डिसेंबरला सरकारला मराठा आरक्षणासाठी कायदा तयार करणार आहे. त्यामुळे मराठ्यांनी गाफील राहू नका, असे आवाहनही जरंगे पाटील यांनी केले आहे.