शबनम न्यूज | मुंबई
“माझ्यावर आणि माझ्या सहकाऱ्यांवर काही गुन्हे दाखल केले आहेत. हे गुन्हे मुंबईकरांच्या हक्कांसाठी लढण्यासाठी दाखल करण्यात आले आहेत. डिलाइल रोडची १२० मीटरची एक लेन तयार असून १० ते १५ दिवसांपासून बंद ठेवली होती. कारण इथल्या घटनाबाह्य खोके सरकारला उद्घाटन करण्यासाठी वेळ नव्हता. तिथल्या रहिवाशांना, काम करणाऱ्या लोकांना अनेक वर्षं तो त्रास होता”, असं आमदार आदित्य ठाकरेंनी पत्रकार परिषदेत सांगितलं.
लोअर परळ पुलावरील दक्षिणवाहिनी बेकायदेशीररित्या वाहतुकीसाठी खुली केल्याप्रकरणी वरळी विधानसभा मतदारसंघातील आमदार आदित्य ठाकरे, विधान परिषदेतील आमदार सुनील शिंदे, सचिन अहिर, माजी महापौर किशोरी पेडणेकर, स्नेहल आंबेडकर आणि पंधरा ते वीस अनोळखी व्यक्तींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यांनतर पत्रकार परिषद घेऊन आदित्य ठाकरेंनी यावर आपली प्रतिक्रिया दिली.
ते म्हणाले, “आम्ही परवा रात्री (१६ नोव्हेंबर) तिथे गेलो, तेव्हा तिथे काही बॅरिकेट्स होते. ते बाजूला करून तिथून आम्ही पुढे चालत गेलो. फोटो काढले आणि रस्ता खुला झाला हे सांगितलं. ही बाजू १०-१५ दिवसांपासून तयार होती. चाचण्या वगैरे सगळं झाल्यानंतरही उद्घाटन कधी करायचं त्यासाठी वेळ मिळत नसलयामुळे मुंबई महानगर पालिका थांबली होती. आम्ही तिथे जाऊन मोठ्या अभिमानाने उद्घाटन केलं आहे. मुंबईकरांसाठी लढत असताना माझ्यावर गुन्हे दाखल झाले असतील, तर माझ्या आजोबांना माझा अभिमान वाटला असता अशीच ही घटना आहे”, असंही आदित्य ठाकरे यावेळी म्हणाले.