शबनम न्युज | मुंबई
मुंबईत महाविकास आघाडीची निर्णायक बैठक सुरू आहे. या बैठकीत राष्ट्रवादी शरद चंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे, काँग्रेसचे बाळासाहेब थोरात आणि वंचितचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर हे प्रमुख नेते उपस्थित आहेत. या बैठकीत लोकसभा निवडणुकीसाठी जागा वाटपावर शिक्कामोतर्फ होण्याची शक्यता दर्शवली जात आहे.
लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहिता कोणत्याही क्षणी जाहीर होण्याची शक्यता असल्याने महायुती आणि महाविकास आघाडी कडून जागा वाटपावर तोडगा काढण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत. महाविकास आघाडीत प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीचा समावेश करण्यात आला असला तरी अद्यापही जागा वाटपाचा तिढा कायम आहे. या पार्श्वभूमीवर आज मुंबईतील फोर सीजन हॉटेलमध्ये सदर बैठक सुरू आहे.
या बैठकीत बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की, “अद्याप मविआत जागावाटपावरूनच तिढा आहे. १० जागांवर काँग्रेस-शिवसेना यांच्यात चढाओढ आहे. ५ जागा अशा आहेत ज्यावर शिवसेना-काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्यात ठरणं बाकी आहे. एकंदरीत १५ जागांवर एकमत झालेले नाही. ही आमची माहिती आहे. त्यामुळे मविआचं जोवर एकमत होत नाही तोवर ते आमच्याशी बोलू शकत नाहीत. १५ जागांमधील एखादी जागा आम्ही मागितली तर आम्ही कुणासोबत बोलायचं? हा तिढा त्यांचा आहे. तो तिढा सुटल्याशिवाय आमच्याशी बोलणी होऊ शकत नाही अशी ही परिस्थिती आहे,” असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.