शबनम न्युज | मुंबई
मुंबई | प्रतिनिधी
यंदाच्या मॉन्सून कालावधीत राज्याला पावसाने पुरते झोपडून काढल्याचे पाहायला मिळत आहे. चक्रीवादळामुळेही हजारो नागरिकांचे कोट्यवधींचे नुकसान झाले आहे. याशिवाय शेतकरी बांधवांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अशावेळी सरसकट पंचनामे करुन शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे. यानंतर अतिवृष्टीमुळे राज्याचे प्रचंड मोठे नुकसान झाले असून, केंद्र सरकारने महाराष्ट्राला ७ हजार कोटींची मदत द्यावी, अशी मागणी राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.
विजय वडेट्टीवार यांनी मराठवाड्यात नुकसानाची पाहणी केली आणि यावेळी बोलताना केंद्राने महाराष्ट्राला मदत द्यायला हवी, असे म्हटले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातला तातडीने १ हजार कोटी रुपयांची मदत दिली. त्या पद्धतीने महाराष्ट्रातील नुकसान पाहता राज्याला किमान ७ हजार कोटींची मदत केंद्र सरकारने करावी, अशी आमची मागणी आहे. त्यासाठी विरोधी पक्षातील नेत्यांना आम्ही भेटणार आहोत. मंत्रिमंडळ बैठकीत हा विषय चर्चेला येणार असल्याचे विजय वडेट्टीवार यांनी म्हटले आहे.