संपादकीय
पुणे शहरातील ‘नवले पूल’ हे अपघातासंदर्भात प्रसिद्ध अशा प्रकारचे पूल बनले आहे. सतत नवले पुलावर अपघात घडत असतात. हा पूल वाहनास ये-जा करण्यास चालू झाल्यापासून अनेक अपघात येथे घडले आहे. अशा अपघातात अनेकजण जखमी किंवा अनेकांचे मृत्यू ही झाले आहेत. कधी अपघात तर कधी वाहतूक कोंडी तर अपूर्ण सेवा रस्ते अशा समस्या या पुलावर निर्माण होतच राहतात. पुण्यातील प्रसिद्ध पुलातून ‘नवले पूल’ हा एक आहे. परंतु सर्वात जास्त अपघाताची मालिका याच पुलावर सुरु असते. पुणे-सातारा महामार्गावरील नऱ्हे येथे वाढत्या अपघातांची संख्या ही एक तीव्र समस्या बनली आहे.
नुकतेच घडलेला सर्वात मोठा अपघात म्हणजे रविवार (दि.२०) रोजी सेल्फी पॉइंटजवळ झालेल्या दोन ठिकाणच्या वेगवेगळ्या विचित्र अपघातात एक दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला असून, १३ जण जखमी झाले होते. तर ४८ हून अधिक वाहनांचे नुकसान झाले. हेच नाहीतर तर मंगळवार (दि.२२) रोजी झालेल्या अपघातात भरधाव वेगात असणारा कंटेनर रस्त्याच्या मध्ये असणाऱ्या दुभाजकावर जाऊन धडकला. या धडकेत २ चार चाकी गाड्यांचे नुकसान झाले असून हा कंटेनर कात्रजच्या दिशेने मुंबईकडे जात होता. रविवारी झालेल्या भीषण अपघातानंतर पुन्हा त्याच ठिकाणी बुधवार (दि.२३) रोजी अपघात झाला. एका कंटेनर ने चारचाकीला पाठीमागून धडक दिली. ह्यात चारचाकी वाहनांचे किरकोळ नुकसान झाले आहे. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.
या अपघातांकडे प्रशासनाचे लक्ष आहे की नाही ? सतत या पुलावर अपघात घडत असतात, तर मग असे आहे का? कि या कडे प्रशासन दुर्लक्ष करीत आहे आणि जर प्रशासनाचे लक्ष आहे तर एकामागे एक अपघात कसे घडत आहे? प्रशासनाने यावर उपाययोजना करायला हवी. सातत्याने होणाऱ्या अपघाताची कारणे शोधण्यासाठी आणि त्यावर उपाय करण्यासाठी तज्ज्ञ समिती नेमली गेली होती. त्या समितीने अभ्यास करून काही उपाययोजना सुचविल्या होत्या, त्या योजना महामार्ग प्राधिकरणाकडून पूर्णही केल्या; तरीही रविवारी भीषण अपघात झाला. यावरून समिती सपशेल नापास झाल्याचे स्पष्ट आहे.
एक अपघात घडतो. त्या अपघातात एका नागरिकाचा ही बळी गेला तर त्यामागे त्याचे असणारे कुटुंब हे उध्वस्त होतात. असेच अपघात नेहमी या पुलावर घडत असतात. अशा अपघाताच्या मालिकांना काही ब्रेक लागत नाही. तर अशा प्रकारचे अपघात परत परत घडू नये, या अपघातांना आळा घालण्यासाठी प्रशासनाने लक्ष घालायला हवे आहे. व्यवस्थित उपाययोजना करायला हवी, आणि हा प्रश्न फक्त प्रशासनाचाच नाहीतर प्रत्येक ये-जा करणाऱ्या नागरिकांचा देखील आहे. नागरिकांनी हाय-वे वरून किंवा कोणत्याही भरधाव रस्त्यावरून येता-जाता वाहन सावकाश चालविणे गरजेचे आहे. आपली काळजी आपण स्वतः घेऊन वाहन चालवताना लक्ष केवळ वाहनाकडेच असायला हवे. कधी कधी नागरिकांच्या निष्काळजीपणामुळेही असे अपघात घडून येतात. तर प्रत्येक समस्याला प्रशासनच जबाबदार असेल असेही नसते. प्रशासनाने ही आपली जबाबदारी कर्तव्याने पार पाडावी आणि नागरिकांनी देखील याकडे लक्ष घालावे.