शबनम न्युज | अहमदाबाद (वृत्तसंस्था)
आज अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर विश्वचषकाचा अंतिम सामना संपन्न झाला. या सामन्यात भारताला पराभव स्वीकारावा लागला. ऑस्टीलियाने भारताचा ६ गडी राखून पराभव केला. आजच्या या सामन्याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. हा सामना भारत जिंकेल अशी अपेक्षा भारतीयांकडून लागली होती, मात्र भारताचे स्वप्न भंगले असल्याचे दृश्य पाहायला मिळाले. भारतीय संघ २००३च्या पराभवाची परतफेड करेल अशी भारतीयांची अपेक्षा फोल ठरली. सलग १० सामने जिंकून फायनलमध्ये पोहोचलेली रोहित शर्मा अँड टीम जेतेपदाच्या लढतीत ऑस्ट्रेलियाकडून हरली.
मोहम्मद शमीने दुसऱ्या षटकात डेव्हिड वॉर्नरला ( ४) माघारी पाठवले. त्यानंतर जसप्रीत बुमराहने पुढील षटकांत मिचेल मार्श ( १५) व स्टीव्ह स्मिथ ( ४) यांना बाद केले. पण, ट्रॅव्हिस हेड व मार्नस लाबुशेन ही जोडी खेळपट्टीवर शड्डू ठोकून उभी राहिली आणि भारताच्या हातून मॅच अलगद घेऊन गेली. या दोघांच्या संयमी आणि तितक्याच जबरदस्त खेळीने भारतीय संघाचे मनोबल खचताना दिसले. पाच वेळचा विजेता ऑस्ट्रेलिया वर्ल्ड कप जिंकण्याची संधी सहजासहजी हातातून जावू देत नाही, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले.
जल्लोष करणारा भारतीय चाहता एका जागेवर स्तब्ध बसलवला. पॅट कमिन्सने विरोधातील प्रेक्षकांना गप्प करण्याची मजा असल्याचे सामन्यापूर्वी म्हटले होते आणि त्याच्या खेळाडूने ते प्रत्यक्षात करून दाखवले. दुखापतीमुळे काही सामन्यांना मुकलेल्या हेडने मोक्याच्या सामन्यात शतक ठोकले. कसोटी अजिंक्यपद फायनलमध्येही याच हेडने १६३ धावा चोपून भारताच्या हातून चषक हिस्कावला होता. लाबुशेननेही ९९ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. विजयासाठी २ धावा हव्या असताना हेड बाद झाला. त्याने १२० चेंडूंत १५ चौकार व ४ षटकारांसह १३७ धावा केल्या. लाबुशेनसोबत त्याची २१४ चेंडूंवरील १९२ धावांची भागीदारी संपुष्टात आली. ग्लेन मॅक्सवलेने पहिल्याच चेंडूवर दोन धावा घेताना ऑस्ट्रेलियाचा ६ विकेट्सने विजय पक्का केला.
, ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी वर्ल्ड कप फायनलचा पहिला टप्पा गाजवला. रोहित शर्माच्या ( ४७) आक्रमक सुरुवातीच्या जोरावर भारताने पहिल्या १० षटकांत २ बाद ८० धावा फलकावर चढवल्या होत्या. पण, शुबमन गिल ( ४) व श्रेयस अय्यर ( ४) हे अपयशी ठरले. विराट कोहली ( ५४) व लोकेश राहुल ( ६६) यांनी १०९ चेंडूंत ६७ धावांची भागीदारी केली. रवींद्र जडेजा ( ९), मोहम्मद शमी ( ६), सूर्यकुमार यादव ( १८), जसप्रीत बुमराह ( १), कुलदीप यादव ( १०) व मोहम्मद सिराज ( नाबाद ९) यांनी थोडा हातभार लावला. ११ ते ४० षटकांत भारतीय फलंदाजांना केवळ ४ चौकार मारता आले. भारताचा संपूर्ण संघ २४० धावांत तंबूत परतला.