पिंपरी चिंचवड , प्रतिनिधी :
चिंतामणी ज्ञानपीठाच्या वतीने दरवर्षी देण्यात येणारा तेजस्विनी पुरस्कार उन्नती सोशल फाउंडेशनच्या संचालिका डॉ. कुंदा संजय भिसे यांना देऊन सन्मानित करण्यात आले. या पुरस्काराचा सुरेख नेत्रदीपक सोहळा गणेश कला क्रीडा मंदिर येथे रंगला. पुरस्काराचे हे सहावे वर्ष होते.
पुण्यनगरीचे माजी माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या शुभहस्ते डॉक्टर कुंदा भिसे यांना सन्मानित करण्यात आले याप्रसंगी भाजप पिंपरी चिंचवड अध्यक्ष शंकर शेठ जगताप तसेच जेएसपीएम संस्थेचे प्रमुख विश्वस्त गिरीराज सावंत हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. व ज्येष्ठ पत्रकार पराग पोतदार, ऐश्वर्या रेणुसे, माजी नगरसेवक विजय उर्फ अप्पा रेणुसे, युवराज रेणुसे, शर्मिला पांडे, अड . दिलीप जगताप , विलासराव भणगे , रोहिणी शिळीमकर, डॉ. मीनल गाडेकर व चिंतामणी ज्ञानपीठातील पालक वर्ग खूप मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मोत्याची माळ, शाल, मानाचा फेटा, मानपत्र, स्मृतिचिन्ह व ज्ञानेश्वरी देऊन डॉ. भिसे यांचा विशेष गौरव करण्यात आला.
कोरोना काळात सामाजिक बांधिलकी जपून भिसे यांनी केलेले काम, रक्तदान, योग शिबिरे, स्वच्छता अभियान आदी माध्यमातून त्यांनी केलेले समाज उपयोगी काम यांचे दखल घेऊन त्यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
पुरस्काराला उत्तर देताना डॉ.कुंदाताई भिसे म्हणाल्या ,
“समाजाचे आपण देणे लागतो या उद्देशाने , मी आणि माझे सहकारी गेल्या अनेक वर्षांपासून उन्नती सोशल फाऊंडेशनच्या मार्फत कार्यरत आहोत. जनहिताच्या दृष्टीने आवश्यक असणाऱ्या सर्व क्षेत्रांना स्पर्श करत काम करण्याचा आम्हा सर्वांचा उद्देश असतो. फौंडेशनच्या स्थापनेची प्रेरणा ही कार्यसम्राट आमदार स्वर्गीय लक्ष्मणभाऊ जगताप आणि जेष्ठ समाजसेवक प्रकाश आमटे यांच्या प्रेरणेने झाली होती. त्यामुळे हा पुरस्कार त्यांना मी समर्पित करते. चिंतामणी ज्ञानपीठाने तेजस्विनी पुरस्काराने मला सन्मानित केले त्याबद्दल मी त्यांची ऋणी आहे. मिळालेल्या पुरस्काराने काम करण्यास अधिक बळ प्राप्त होईल. “
यावेळी मोहोळ म्हणाले, अवघ्या 12 विद्यार्थ्यांपासून सुरू झालेले ज्ञानदानाचे काम आज विस्तारले असून चिंतामणी ज्ञानपीठाचा आज वटवृक्ष झालेला आहे. दहा हजार विद्यार्थी आज येथे शिक्षण घेत आहेत. उत्तम शिक्षण देतानाच या संस्थेने जपलेली विश्वासार्हता अधिक महत्त्वाची आहे. आधुनिक काळाच्या बरोबर जाताना इंग्रजीतून शिक्षण देत असतानाच आपली परंपरा आणि संस्कृती जतन करण्याचे काम देखील केले जात आहे. पुणे हे विद्येचे माहेरघर असताना चिंतामणी ज्ञानपीठ सारख्या संस्था शहराचे नाव देशांमध्ये मोठे करण्याचे काम करतात.
गिरीराज सावंत म्हणाले, तेजस्विनी पुरस्काराच्या रूपाने महिलांचे सक्षमीकरण करण्याचे आणि त्यांना एक उत्तम व्यासपीठ मिळवून देण्याचे काम केले जात आहे, ही खरोखरच चांगली बाब आहे.
यानिमित्ताने राष्ट्रीय स्तरावर उत्तम कामगिरी केलेल्या खेळाडूंचा प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीमध्ये सन्मान करण्यात आला. यावेळी मुलांनी मल्लखांब, लाठीकाठी, तलवारबाजी यांचे सादरीकरण केले. याप्रसंगी विविध विद्यार्थ्यांनी नृत्य सादर करून कार्यक्रमाचे रंगत उत्तरोत्तर वाढवत नेली. प्रास्ताविक ऐश्वर्या रेणुसे व आभार प्रदर्शन शर्मिला पांडे यांनी केले.