शबनम न्युज | पिंपरी
पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी घंटागाड्यांवर ध्वनिक्षेपक लावून नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात यावी, शहरातील मोडकळीस आलेल्या, धोकादायक असणा-या खाजगी आणि महापालिकेच्या इमारती तात्काळ पाडण्यात यावेत, रस्त्याच्या कडेला असलेले धोकादायक वृक्षांची छाटणी करण्यात यावी, गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पाऊस व खड्ड्यांमुळे खराब झालेले रस्ते तात्काळ दुरुस्त करण्यात यावेत, अशा विविध सूचना जनसंवाद सभेमध्ये नागरिकांनी प्रशासनाला केल्या.
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने नागरिक आणि प्रशासन यांच्यामध्ये सुसंवाद राखण्यासाठी तसेच तक्रारींचे निवारण जलदगतीने करण्यासाठी जनसंवाद सभेचे आयोजन करण्यात येते. महापालिकेच्या आठही क्षेत्रीय कार्यालयांमध्ये आज जनसंवाद सभा पार पडली. महापालिकेच्या वतीने आज पार पडलेल्या जनसंवाद सभेत ६४ नागरिकांनी सहभाग घेऊन तक्रारवजा सूचना मांडल्या. यात अ, ब, क, ड, इ, फ, ग आणि ह क्षेत्रीय कार्यालयामध्ये अनुक्रमे १८, ८, ३, ६, ७, ३, १२ आणि ७ इतक्या नागरिकांनी उपस्थित राहून आपले म्हणणे मांडले.
अ, ब, क, ड, ई, फ, ग, ह, या क्षेत्रीय कार्यालयांच्या जनसंवाद सभेचे अध्यक्षपद मुख्य समन्वय अधिकारी असलेले अनुक्रमे समाज विकास विभागाचे उप आयुक्त चंद्रकांत इंदलकर, अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप, पर्यावरण विभागाचे सह शहर अभियंता संजय कुलकर्णी, सह शहर अभियंता सतीश इंगळे, पाणीपुरवठा विभागाचे सह शहर अभियंता श्रीकांत सवणे, शहर अभियंता मकरंद निकम, भूमी आणि जिंधगी विभागाचे सहायक आयुक्त प्रशांत जोशी, आरोग्य विभागाचे उप आयुक्त अजय चारठाणकर, यांनी भूषवले. तसेच आठही क्षेत्रीय कार्यालयाचे क्षेत्रीय अधिकारी सुचिता पानसरे, अभिजीत हराळे, अण्णा बोदडे, उमाकांत गायकवाड, राजेश आगळे, सीताराम बहुरे, विनोद जळक, विजयकुमार थोरात हे उपस्थित होते. आठही क्षेत्रीय कार्यालयातील जनसंवाद सभेत स्थापत्य, जलनिस्सारण, पाणीपुरवठा, विद्युत, नगररचना विभागांचे कार्यकारी अभियंता, उद्यान, वैद्यकीय, आरोग्य, करसंकलन या विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
आज झालेल्या जनसंवाद सभेत नागरिकांनी विविध तक्रारी व सूचना मांडल्या, जलवाहिन्या टाकण्यासाठी रस्त्यांच्या दोन्ही बाजूंनी खोदण्यात येऊ नये, त्यामुळे नागरिकांना रहदारीस अडथळा निर्माण होत आहे. खोदण्यात आलेल्या धोकादायक ठिकाणी बॅरीगेट्स लावण्यात यावेत, पाणी पुरवठा पुरेशा दाबाने करण्यात यावा. जलवाहिन्यांचे अर्धवट असलेले काम तातडीने पूर्ण करावे, उघड्यावर कचरा टाकणाऱ्या नागरिकांवर कारवाई करावी, पदपथ आणि रस्त्यावरील अतिक्रमणामुळे नागरिकांची गैरसोय होत असल्याने असे अतिक्रमण काढण्यात यावे. नागरिकांच्या सेवेसाठी पूर्वी सुरु असलेल्या मार्गांवर पुन्हा पीएमपीएमएल बस सेवा सुरु करावी, चेंबर मधून गटारीचे पाणी रस्त्यांवर येत असल्यामुळे सगळीकडे दुर्गंधी पसरून आरोग्यास धोका निर्माण होत आहे, नव्याने डांबरीकरण केल्यामुळे चेंबर खोल गेले आहेत, त्यामुळे रस्त्यात पाणी साचते आहे. चेंबर, रस्त्यात पडलेले खड्डे तात्काळ दुरुस्त करण्यात यावेत, नाले वेळोवेळी स्वच्छ करण्यात यावेत, रस्त्यांच्या बाजूने पथदिवे लावावेत, सार्वजनिक गणेश मंडळांनी गणेशोत्सव साजरा करताना नागरिकांना रहदारीस तसेच वाहतुकीस अडथळा निर्माण होणार नाही याची दक्षता घेण्याबाबतची अट महापालिकेने गणेश मंडळांना परवानगी देताना ठेवावी, अशा सूचना व तक्रारी आज झालेल्या जनसंवाद सभेमध्ये नागरिकांनी मांडल्या.