शबनम न्युज | बारामती
एखाद्याचा अश्वमेध रोखल्यावर जो त्रास होतो तो त्रास आदरणीय शरद पवार साहेबांच्या बारामतीत भाजपला होतोय, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी लगावला आहे.
बारामतीत कोणीही आले तरी एक लाखापेक्षा जास्त मताधिक्य सुप्रियाताई सुळे आणि अजितदादा पवार यांना मिळतेच. बारामतीत सूर्य एखाद्यावेळी पश्चिमेकडे उगवेल परंतु बारामती पवार साहेबांना सोडणार नाही, एवढं ते घट्ट नातं आहे, असेही जयंत पाटील यांनी सांगितले.
बारामतीत उमेदवार कोण द्यायचा हे भाजप ठरवेल. बारामती सध्या भाजपचे टार्गेट आहे शिवाय आमच्याकडेही टार्गेट केले आहे. आम्ही सर्वात मोठ्या लोकांना टार्गेट करतोय, असं वातावरण मीडियासमोर तयार करण्याची ही भाजपची पद्धत आहे. थोड्या दिवसात आमचाही प्लॅन सांगू, असे त्यांनी स्पष्ट केले.
सत्तेत राहून लोकांची कामे करायची सोडून भाजप नेते अशा तयारीला लागले आहेत. याचा अर्थ भाजपला आपली लोकप्रियता कमी व्हायला लागली असल्याचे लक्षात आले आहे. जेव्हा त्यांची लोकप्रियता कमी होते तेव्हा अशा गोष्टी भाजप करते, असा हल्लाबोलही जयंत पाटील यांनी केला.
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना भाजपने विधानसभेचे तिकीट नाकारले होते. ते का नाकारले, याची चर्चा करु इच्छित नाही, परंतु बावनकुळे यांनी पवार साहेबांसारख्या मोठ्या नेत्याबद्दल अशा पद्धतीने बोलणे त्यांना शोभत नाही, असा टोलाही जयंतराव पाटील यांनी लगावला.