शबनम न्युज | मुंबई
राज्यातील कृषी आणि कृषी संलग्न महाविद्यालयात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय दूर होणार आहे, तसेच महाविद्यालयांनाही अंतिम तारखेपर्यंत प्रवेश देणे शक्य होणार आहे. या संदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत आज बैठक पार पडली. या बैठकीत विविध निर्णय घेण्यात आले.
सदर बैठकीत महाविद्यालय किंवा संस्थांना खाजगी कृषी विद्यापीठ स्थापना परवानगी देणे संदर्भातही विचार विमर्श करण्यात आले. तसेच कृषी आणि कृषी संलग्न महाविद्यालयांच्या केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेचे नियमांमध्ये बदल करून ही प्रक्रिया अभियांत्रिकीसारख्या व्यावसायिक अभ्यासक्रमानप्रमाणे राबवण्याचा निर्णय देखील या बैठकीत घेण्यात आला, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे.
पवार म्हणाले, या निर्णयामुळे कृषी अभ्यासक्रमांना प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रत्येक टप्प्यानंतर महाविद्यालयात रिक्त राहिलेल्या जागांची माहिती मिळणार असून, त्याप्रमाणे पर्याय निवडता येणार आहेत. यामुळे कृषी अभ्यासक्रमांना प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय दूर होणार आहे. तसेच महाविद्यालयांनाही अंतिम तारखेपर्यंत प्रवेश देणे शक्य होणार आहे.
तसेच कृषी महाविद्यालयांच्या प्रवेशप्रक्रिया नियमांमध्ये बदल करताना ते विद्यार्थ्यांसाठी अधिकाधिक सोयीचे असतील तसंच राखीव जागांचा लाभही विद्यार्थ्यांना मिळेल, याचीही काळजी घेण्यात येणार आहे. कृषी प्रवेश प्रक्रिया महाराष्ट्र राज्य कृषी शिक्षण व संशोधन परिषदेमार्फत केंद्रीभूत पद्धतीनं राबवण्याबाबतही बैठकीत सकारात्मक निर्णय घेण्यात आला. कृषी शिक्षण क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी असलेल्या महाविद्यालये किंवा संस्थांना खासगी कृषी विद्यापीठ स्थापण्यास परवानगी देण्यासंदर्भातही बैठकीत विचारविमर्श करण्यात आला. राज्यातील विविध कृषी विद्यापीठे, कृषी महाविद्यालये, रोपवाटीका आदींच्या प्रश्नांबाबतही बैठकीत चर्चा करण्यात आली.